कर्मचाऱ्यांचा निर्र्धार : शतकोटींची उलाढाल ठप्प अमरावती : कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात बँक व्यवस्थापनाला स्वारस्य नाही. कर्मचाऱ्यांबाबत व्यवस्थापनाची भावनाच संवेदनशून्य आहे. महागाई भत्त्यात कित्येक वर्षांत वाढ नाही, वाढत्या महागाईचा सामना कसा करावा, असा सवाल एका महिला कर्मचाऱ्याने व्यक्त केला. एकीकडे बँक नफ्यात असताना कर्मचाऱ्यांना भत्ता द्यायला पैसे नाहीत. दुसरीकडे बँक व्यवस्थापनाची उधळपट्टी सुरु आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण होईपर्यंत संप कायम राहिल, असे कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी संघटनेच्या संपाला तीन दिवस झाले असताना व्यवस्थापनाद्वारा कुठलीही तडजोड नाही. संघटना व व्यवस्थापन आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने संघर्ष अटळ आहे. या तीन दिवसांत जिल्हा बँकेची १०० कोटींची उलढाल ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील ८८ शाखांचे कामकाज बंद असल्याने शेतकरी व ग्राहक मात्र नाहक वेठीस धरले जात आहेत. कर्मचाऱ्यांना महागाईभत्ता पूूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावा, अनुकंपा तत्त्वावरील भरती त्वरित सुरु करावी, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घ्यावे, रोखलेल्या वेतनवाढी व पगार देण्यात यावेत, कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेळेत काम देऊ नय, सेवा नियमांमध्ये केलेला एकतर्फी बदल रद्द करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेद्वारा ११ मेपासून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. संपात ८८ शाखांचे ६०० कर्मचारी सहभागी झाल्याने सर्व शाखांचे कामकाज ठप्प आहे. व्यवस्थापनाने ेअद्याप चर्चेची तयारी दाखविली नाही. संपाला भारतीय मजदूर संघ, राज्य सहकारी बँक कर्मचारी महासंघ, खामगाव कोआॅपरेटिव्ह बँक कर्मचारी संघाने पाठिंबा घोषित केला आहे.कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. बँकेचे धोरण कर्मचारीविरोधी व एककल्ली आहे. बंदातून माघार घ्यावी, यासाठी कर्मचाऱ्यांवर दडपण आणले जात आहे. परंतु मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार. - प्रभाकर किलोर, सचिव, कर्मचारी संघटना
आता माघार नाही
By admin | Updated: May 14, 2015 00:16 IST