धरणे आंदोलन : शिक्षक, शाळांचे विविध प्रश्न, समस्या कायमअमरावती : उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये आणि शिक्षकांचे प्रश्न, समस्या प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमिवर शासनाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्यावतीने सोमवारी शिक्षक दिनी ‘काळा दिन’ म्हणून पाळला गेला. शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने एक दिवसीय धरणे आंदोलन करुन शिक्षकांनी शिक्षक दिन ‘काळा दिन’ म्हणून पाळला. शासनाने प्राथमिक व माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान देण्याचे मान्य केले. परंतु त्याच बरोबर गत १५ ते १६ वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन पात्र प्रस्ताव गत दोन महिन्यांपासून शासनाने यादी घोषित केलीे नाही. या तरतुदीचा विषय शासनाने विचारधीन घेतला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील आझाद मैदान तर शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे. एकिकडे प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा सुरू असताना विनाअनुदानित शाळा, उच्च माध्यमिक शाळांचे अनुदान न देता त्यांना ताटकळत ठेवण्याचे धोरण शासनाने आखले आहे. शासनाच्या या धोरणामुळे अनेक शिक्षकांना मृत्यूच्या दारी जावे लागत असताना राज्यात २२ हजार ५०० शिक्षक रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे अनुदान पात्र यादी मान्य करुन १०० टक्के आर्थिक तरतूद जाहीर करण्यात यावी, उर्वरित उच्च माध्यामिक शाळांचे मुल्यांकनाचे आॅफलाईन मुल्यांकन आदेश देण्यात यावे, सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यतेचे आदेश देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शेखर भोयर, संजय खोडके, सुलभा खोडके संतोष वाघ, गजानन वाघ, संतोष गावंडे, गाजी जहरोश, प्रशांत कंवर, पुरुषोत्तम येरेकार आदी उपस्थित होते.
शिक्षक दिन ‘काळा दिन’ म्हणून पाळला
By admin | Updated: September 6, 2016 00:12 IST