अमरावती : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी शासनाने ३१ जुलैची मुदत दिली असून, त्यानंतर १४ ऑगस्टपर्यंत विशेष बदल्या होणार आहेत. त्यामुळे सध्या सर्वच कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. शिक्षकदेखील बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, शिक्षकांच्या बदल्यांसाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करणे आवश्यक असून त्यासाठी किमान ३ महिने लागतील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विजयादशमीपर्यंत बदल्यांचे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शासनाने शिक्षक बदलीसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केला होता. त्यातील काही चुकांमुळे किंवा सॉफ्टवेअरच्या मर्यादेमुळे काही चुकीच्या बदल्या झाल्याचे प्रकार पुढे आले. त्यानंतर विद्यमान सरकारने शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातील आणि धोरण ठरविण्यासाठी ५ सदस्सीय समिती गठित केली होती. या समितीने बदल्यांसाठी सध्या वापरण्यात येत असलेल्या सॉफ्टवेअरच्या मर्यादा असून, त्यातील तंत्रज्ञान आता कालबाह्य झाले आहे, असा अहवाल दिल्याची माहिती आहे. त्यासोबतच समितीने बदल्यांसाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करावे आणि त्यानंतरच बदल्या करण्यात याव्यात, अशी शिफारस राज्य सरकारला केल्याची माहिती आहे. राज्य सरकारने अद्याप या शिफारशींवर निर्णय घेतला नसला तरी समितीची शिफारस मंजूर करण्याचाच मतप्रवाह प्रशासन आणि शासनात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता नवीन सॉफ्टवेअर तयार करायला किमान ३ महिने तरी लागतील आणि तोपर्यंत शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत अशीच परिस्थिती सध्यातरी आहे. त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत देव पाण्यात घालून बसलेल्या शिक्षकांना आणखी ३ महिने तरी थांबावे लागणार असून विजयादशमीनंतरच जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदल्यांचे धामधूम राहणार असल्याचे दिसून येत आहे.