अमरावती: राजकमल ते गांधी चौक अंबादेवीच्या मंदिराकडे जाणार रस्ता लाखो रुपये खर्च करून रुंद करण्यात आला. येथे फुटपाथही करण्यात आले. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या फुटपाथ किरकोळ व्यवसायिकांनी गिळंकृत केल्या आहे. त्यामुळे येथे येणा-या वाहनचालकांनासुद्धा पार्किंगला जागा नसते. नागरिक वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्याने या मार्गावरील वाहतुकीलासुद्धा अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
राजकमल ते गांधी चौकाकडे जाणार हा महापालिकेचा रस्ता आहे. गेटच्या आतमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. लॉकडाऊनमध्ये बंद असलेले अंबा-एकवीरा देवीचे मंदिर अनलॉकमध्ये आता भाविकांना दर्शनासाठी खुले केल्याने या मार्गावर भाविकांचा राबता वाढला आहे.
परंतु गांधी चौककडे जाणाऱ्या मार्गावर किरकोळ व्यावसायिक, कपडे विक्रेता, खाद्यपदार्थ विक्रेत तसेच विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणाऱ्यांनी राजरोजस फुटपाथवरच आपली दुकाने थाटून फुटपाथ गिळंकृत केल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. मार्गावर काही महत्त्वाच्या व्यावसायिकांची प्रतिष्ठाने असल्याने येथे खरेदीसाठी नागरिक येतात. परंतु त्यांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा नसल्याने ज्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले त्यांच्या समोरच वाहने उभी ठेवावी लागतात. त्यामुळे संपूर्ण रस्ता व्यापला जातो. इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने येथे अनेकदा वाहतूक कोंडीसुद्धा होते. येथील फुटपथावर ज्या व्यावसायिकांनी आपला व्यवसाय थाटला ती दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलनविरोधी पथकाने काढून शहरातील नागरिकांना पायदळ चालण्याकरिता फुटपाथ मोकळे करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
कोट आहे.