अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने गतवर्षी मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. या मालवाहतूक सेवेचे दर कमी असल्यामुळे राज्यभरातून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण मागील अनेक महिन्यांपासून डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे महामंडळाने मालवाहतूक दरात वाढ करण्याचे आदेश काढले असून, ११ जानेवारीपासून मालवाहतुकीच्या दरात प्रतिकिलोमीटर ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
कोरोना काळात सर्व प्रवासी एसटी बसेस उभ्या होत्या. परिणामी एसटीचे उत्पन्न थांबलेले होते. एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी मालवाहतूक सेवेला सुरुवात करण्यात आली. यासाठी एक किलोमीटर मालवाहतुकीसाठी ३८ रुपये प्रतिकिलोमीटर असे ठरविण्यात आले होते. यात तीन टप्पे पाडण्यात आले असून, १०० किलोमीटरपर्यंत ४२ रुपये प्रतिकिलोमीटर, कमीत कमी ३५०० रुपये दर ठरविण्यात आले आहेत. १०१ ते २५० किलोमीटरपर्यंत ४० रुपये प्रतिकिलोमीटर आणि २५१ किलोमीटरच्या पुढे ३८ रुपये प्रतिकिलोमीटर दर ठेवण्यात आले आहेत. मालवाहतुकीच्या नव्या दरवाढीला डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याचे कारण सांगण्यात आले आहे.
बॉक्स
या नियमात झाले बदल
मागील आदेशानुसार जर परतीचे भाडे मिळत नसेल तर सर्वात कमी ३२ रुपये व ३६ रुपये आणि परतीच्या वेळी ३२ रुपये प्रतिकिमी दर असायचे. परंतु नवीन नियमानुसार १०० किलोमीटरपर्यंत जाताना ४० रुपये आणि परतीच्या प्रवासाला ३८ रुपये प्रतिकिमीटरप्रमाणे दर लागू होतील, असे सांगण्यात आले. हे नवीन दर ११जानेवारीपासून अंमलात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली.