अंजनगाव सुर्जी : चार महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अंजनगाव तालुक्यातील खोडगाव, देवगाव, शेलगाव, पांढरी, दहिगाव भागातील पानपिंपरी, केळी, कपाशी व इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने ते हवालदिल झाले आहेत.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनगाव तालुक्यात ६०-७० वर्षांपासून पानंपिपरी या वनौषधी पिकाची लागवड केली जाते. नोव्हेंबर महिन्यात हे पीक तोडणीला येते. परंतु चार महिन्यांपूर्वी झालेल्या पावसाने या भागातील पानपिंपरीसह अन्य पिके नेस्तनाबूत झाली. शेतकरी मनोहर मुरकुटे, मनोहर भावे, संजय नाठे यांनी त्याबाबत तहसील प्रशासनाला अवगत केले. परंतु, चार महिने उलटूनही मदतीचा छदामही मिळालेला नाही.