साशंकता : ५०० जणांना चार महिन्यांपासून वेतन नाही अमरावती : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणून दैनंदिन कामकाज दररोज संबंधित खात्यात संगणकावर आॅनलाईन नोंदविण्यासाठी संगणक कक्षाची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कंपनीमार्फत संगणक परिचालकांची नेमणूक करण्यात आली. परंतु तेराव्या वित्त आयोगाची मुदत संपल्याने तसेच हा कार्यक्रमही त्याच वित्त आयोगातील तरतुदीवर सुरुअसल्याने या संगणक परिचालकांवर टांगती तलवार आहे. कार्यरत कंपनीलाही मुदतवाढ मिळणार की, नव्याने निविदा प्रक्रिया होणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. राज्यभरातील ग्रामपंचायती आॅनलाईन करून संगणक कक्षाची स्थापना करण्यात आली. याचे मुख्य सर्व्हर जिल्हा परिषदेत ठेवून आहे. या ठिकाणी सर्व माहितीची पडताळणी करण्यात येते. संगणक कक्षाची ग्रामपंचायतीत कंपनीकडून कंत्राटी संगणक परिचालक नेमले आहेत. जिल्ह्यात एकूण ५५० हून अधिक संगणक परिचालक नेमण्यात आले होते. सध्या ५०० जण कार्यरत आहेत. त्यांचे चार महिन्यांपासून वेतन झालेले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, निविदेतील दरानुसार प्रती परिचालकाला ८ हजार रुपये मानधन शासनाकडून कंपनीला मिळते. मात्र परिचालकांना प्रत्यक्षात ४ हजार ५०० रुपये मानधन दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. ९० दिवसांपासून 'इनव्हाईस'च सादर न झाल्याने मानधन रखडल्याचे कळते.तेराव्या वित्त आयोगाला शासनाने ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदरवाढ दिली आहे. त्यामुळे सध्या संग्राम कक्षातील कामे सुरू आहेत. याबाबत शासनाकडून नवीन सूचना येतील त्यानुसार ही प्रक्रिया सुरू राहील. - जालिंधर आभाळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग, जि.प.
ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालकांवर टांगती तलवार
By admin | Updated: October 27, 2015 00:15 IST