बडनेरा : लॉकडाऊनच्या काळात रेल्वेने अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून काही बसफेऱ्या रेल्वे स्थानकाहून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन अमरावती महापालिका व अचलपूर नगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यादरम्यान संपूर्ण वाहतूक ठप्प राहणार आहे. तथापि, बडनेरा व अमरावती रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय व आर्थिक लुबाडणूक टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून एसटी महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांकडून काही बस सोडल्या जाणार आहेत. रेल्वे स्थानकावरून या बस सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती बडनेरा बस स्थानकाचे व्यवस्थापक अभय बिहुरे यांनी दिली. केवळ रेल्वे मार्ग नसलेल्या परतवाडा, यवतमाळ, मोर्शी, वरूड यांसारख्या नजीकच्या गावांसाठी या बस धावतील. प्रवासी संख्या बघूनच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. एसटी सुरू करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
------
रेल्वेचा चार ओळींचा जोड येत आहे.