वृक्षप्रेमींवर चिंतेचे सावट : तिवसा-चांदूररेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोडरोशन कडू तिवसा दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाचा गैरफायदा घेत लाकूड तस्कर वृक्षांच्या बुंध्याखाली विस्तव टाकून हजारो हिरवेकंच वृक्षांची कत्तल करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तिवसा-चांदूररेल्वे आणि तिवसा-चांदूरबाजार रस्त्यालगतच्या शेकडो वृक्षांची याच पद्धतीने जाळून कत्तल केली जात आहे. आग पसरल्याने परिसरातील झुडुपी व जैवविविधतेसही धोका निर्माण झाला आहे. शेंदूरजनाबाजार ते तिवसा येथे रस्त्यावर शेकडो झाडांची कत्तल होत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी आग लावून गवत जाळण्यात आले आहे. मोठमोठ्या झाडांचे केवळ बुंधेच शिल्लक आहेत. तस्करांनी झाडांची खोडे तोडून नेल्याचे स्पष्ट होते. वृक्षतोडीवर बंदी असून त्यासाठी वन विभागाचे कडक कायदे अस्तित्वात आहेत. त्यापासून वाचण्यासाठी लाकूड तस्करांनी नामी शक्कल लढविली आहे. झाडांच्या बुंध्याखाली रात्रीच्या वेळी पेटलेले विस्तव टाकले जातात. तापमान जास्त असल्यामुळे विस्तव विझत नाहीत. त्यामुळे झाड काही वेळातच पेट घेते. दहा ते बारा तासांमध्ये हिरव्या झाडांचा बुंधा पूर्ण जडतो आणि झाड कोसळते. झाड कोसळल्यानंतर लाकुडतोडे आधी फांद्या तोडून घेऊन जातात आणि काही दिवसांनी झाडाचे पूर्ण खोड घेऊन जातात. या पद्धतीने दरवर्षी हजारो वृक्षांची राजरोसपणे कत्तल होते. वृक्षाला लागलेल्या आगीत परिसरातील गवत छोटी-मोठी झाडे झुडूपेही जळून खाक होतात. त्यामुळे जैवविविधतेचाही ऱ्हास होत आहे. वृक्षांची होणारी अशाप्रकारची कत्तल रोखण्यासाठी शासनाकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाही, हेच दुर्दैव आहे.मैलकुलीच्या दुर्लक्षाने तस्करीला उधाणरस्त्यालगत असलेली झाड बांधकाम विभागाच्या ताब्यात असतात. झाडांचे रक्षण व देखभालीची जबाबदारी बांधकाम विभागाकडेच असते. जाळून वृक्षांची कत्तल करण्याच्या प्रकारात काही वर्षांपासून वाढ झाली आहे. याकडे बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या देखभालीसाठी मैलकुलींची नियुक्ती करण्यात येते. तेही झाडांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे लाकूड तस्करीला उधाण आले आहे. अपघाताला निमंत्रणबुंध्याखाली विस्तव टाकलेले झाड पहाटेपर्यंत कोसळले. कारंजा ते अमरावती मार्गावर अशाच एका कोसळलेल्या वृक्षावर जीपगाडी धडकल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहा अधिकारी ठार झाले होते. त्यामुळे याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. शासनाने कडक मोहीम राबवायला हवीया प्रकाराकडे गांभिर्याने बघायला हवे. शेकडो वर्षापासून असलेल्या हजारो वृक्षांची राजरोसपणे कत्तल करण्यात येत आहे. परिणामी पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने या विरोधात कडक मोहीम राबवायला हवी. झाड जळताना दिसल्यावर नागरिकांनीही ते त्वरीत विझवायला हवे.
बुंध्याखाली विस्तव टाकून वृक्षांची कत्तल
By admin | Updated: April 30, 2016 00:19 IST