कर्तव्यात कसूर : तिघांची वेतनवाढ रोखली
प्रसन्न दुचक्के - अमरावती
लोकसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी छापामारी करून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने अवैध धंदे करणार्या आरोपींना अटक केली. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हा प्रकार आढळून आला त्या पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्ह्यात १६ पोलीस निरीक्षकांना या नोटीशी बजावण्यात आल्या आहेत. तीन ठाणेदारांकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने त्यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेशही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ठिकठिकाणी छापामार कारवाई करुन आरोपींना अटक केली होती. निवडणूक काळात जिल्ह्यात काटेकोर बंदोबस्त असतानासुध्दा अवैध धंदे आढळून आल्याने संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी जिल्ह्यातील १६ पोलीस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीशी बजावल्या आहेत. यापैकी तीन पोलीस निरीक्षकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने एक वर्षाची वेतनवाढ रोखून त्यांना नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आले आहे.