अमरावती : वाळवटांतील जहाज उंट उन्हाळा लागताच महाराष्ट्रात चारा पाण्याच्या शोधार्थ दाखल होतात. हा प्राणी त्या समुदायासाठी जीव की प्राण, असा सर्वसामान्यात समज रूढ आहे. मात्र, गरज पडल्यास उंट वाटेतच टाकून ते निघून जातात. असे अलीकडच्या दोन घटनांनी स्पष्ट झाले. प्राणी मित्र संघटनानी मागे पडलेल्या व त्यामुळे रस्त्यात भरकटलेल्या अशा दोन उंटाची सुश्रृशा करून पुढील उपचाराकरिता वेगवेगळ्या प्राणी संघटनाकडे सोपविले आहे. चांदूर बाजार ते ब्राम्हणवाडा शिवारात उंट जखमी आणि बेवारस अवस्थेत अभिजित गणोरकर यांना दिसला. तो जखमी आणि बेवारस अवस्थेत असल्याने त्यांनी याची माहिती 'वसा' संस्थेला दिली. वसाचे गणेश अकर्ते, मुकेश वाघमारे, भूषण सायंके, निखिल फुटाणे आणि आकाश वानखडे यांनी ब्राम्हणवाडा शिवारातून जखमी उंटाला रेस्क्यू केले. उंट जखमी अवस्थेत भुकेने व्याकूळ झाल्याने तो जवळ कुणाला येऊ देत नव्हता. जखमी उंटाला अमरावतीत उपचाराकरिता आणण्यासाठी गोरक्षण संस्था अमरावती यांनी मदत केली.
------------------------
प्राण्यांचा उपयोग नसला की त्यांना बेवारस सोडतात
अमरावती : जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे. उंटाचा कळप घेऊन येणारे हे राजस्थानी लोक जोपर्यंत उंटाकडून उत्पन्न मिळते तोपर्यंत त्याचा सांभाळ करतात. एकदा तो उंट जखमी झाला किंवा आजारी पडल्यास त्याची सुश्रुषा उपचार न करता त्याला बेवारस सोडून पुढे निघून जातात. मालक आणि इतर संवगड्यापासून दूर झाल्यानंतर हे प्राणी स्ट्रेसमध्ये जातात. आधीच जखमी अवस्थेत असल्याने त्यांना त्यांच्या स्थळापर्यंत परत जाता येत नाही.
---------------------------------------------------------------------------------------
श्री गोरक्षण संस्था आणि वसा घेत आहेत काळजी
ब्राम्हणवाडा शिवारातून रेस्क्यू केलेल्या जखमी उंटाची देखभाल व त्याला आश्रय दस्तुरनगर येथील गोसदन येथे घेण्यात येत आहे.
---------------
अन्य एका गटने सावळापूर, आसेगाव पूर्णा शिवारात ग्रामस्थांनी जखमी उंटाला पाहिले. त्यांनी याची माहिती 'हेल्प फाऊंडेशन' सस्थेला दिली. त्यांनी या उंटाला रेस्क्यू करून अमरावतीच्या 'वऱ्हाड' या संस्थेला पुढील उपचाराकरिता देण्यात आले. काही दिवसांआधी अशा जखमी उंटाबद्दल 'हेल्प फाऊंडेशन'ला माहिती मिळाली होती. तो उंट अत्यवस्थेत होता. त्याला निट उभे राहता येत नव्हते. त्याच्या पायाचे हाड तुटले असावे, असा अंदाज व्यक्त होत होता. उंटाच्या उपचारावर येणारा खर्च अधिक असल्यामुळे हेल्प फाऊंडेशनने तो उंट नागपूर येथील 'माहेश्वरी फाऊंडेशनकडे ऑपरेशनकरिता पाठविला. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.