भक्कम पाठबळ : महिला कायद्यातील बदलासाठी प्रयत्नशीलअमरावती : तब्बल वर्षभर अंधार कोठडीत काढून मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या जयश्री दुधे हिची विदारक अवस्था पाहून आ.यशोमती ठाकूर अक्षरश: गहिरवरल्या. जयश्री दुधे हिची आ.ठाकूर यांनी रविवारी सायंकाळी इर्विन गाठून भेट घेतली. तिला सर्वतोपरीने मदतीचे आश्वासन दिल्यानंतर जयश्रीसह तिच्या कुटुंबियांना भक्कम पाठबळ दिले. जयश्रीवरील अत्याचाराची करुण कहाणी ऐकल्यानंतर महिलाविषयक कायद्यात बदल करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आ. ठाकूर म्हणाल्या. माहुर येथील सासरच्या मंडळीने जयश्रीला वर्षभर अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवून तिचा अनन्वित छळ केला.वकील म्हणून उभी राहीनअमरावती : या वृत्ताला 'लोकमत'ने ठळक प्रसिद्धी दिली. वृत्ताची दखल घेत अनेकांनी इर्विन गाठले. जयश्रीवरील अन्यायाला वाचा फुटल्यानंतर आ. यशोमती ठाकूर यांनी संवेदनशील दखल घेत रविवारी इर्विन गाठून जयश्रीची भेट घेतली. यावेळी आ.ठाकूर यांना पाहून जयश्रीच्या डोळे पाणावले. जयश्रीने तिच्या वेदना आ.ठाकूर यांच्यासमोर मांडल्यानंतर त्या गहिवरून आल्यात. जयश्रीची आपबिती ऐकल्यानंतर अत्याचाराची सीमा गाठणाऱ्या सासरच्या मंडळीविरुध्द कठोर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले. दररोज आमच्यातील एक जण तुला भेटायला येईल, अशी ग्वाही आ.ठाकूर यांनी जयश्रीला दिली. मी तुझ्या पाठीशी आहे, असा धीर दिला. आ.ठाकूर यांनी जयश्रीच्या डोक्यावरून हात फिरून तिला प्रेमाचा दिलासा दिला. तुला लवकरच चालत बाहेर यायचे आहे, अशीच हासत रहा, तुझ्या मुलांची भेट घालून देण्याची जबाबदारी माझी, असा विश्वास आ.ठाकूर यांनी जयश्रीला दिला. त्यानंतर जयश्रीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. यावेळी जि.प. सदस्य चित्रा डहाणे, पंचायत समिती सदस्य मंगेश भगोले, कविता पचलोरे, धिरज श्रीवास, वैभव वानखडे, अनिकेत देशमुख, प्रल्हाद चव्हाण, अल्केश काळबांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सर्वपरीने मदतीचे आश्वासनजयश्रीच्या वेदना व तिचे हाल पाहून आ.ठाकूर यांचे दु:ख अनावर झाले. महिलांचा आजही इतका भयानक छळ केला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जयश्रीला सर्वपरीने मदत करू, कायद्याची लढाई लढू, आवश्यक पडल्यास जयश्रीच्या पाठीशी वकील म्हणूनसुध्दा उभे राहू, अशी ग्वाही आ.यशोमती ठाकूर यांनी जयश्रीला सांत्वन भेटीदरम्यान दिली. औचित्याचा मुद्दा मांडणार जयश्रीची भेट घेतल्यानंतर आ.ठाकुर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महिलाविषयक कठोर कायदा असतानाही महिलांवर अन्याय केल्या जात असल्याची खंत आ.ठाकूर यांनी व्यक्त केली. जयश्रीच्या निमित्याने पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडून २००४ व २००५ च्या कायद्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
जयश्रीला पाहून आ.ठाकूर गहिवरल्या
By admin | Updated: July 24, 2016 23:58 IST