शेवगाव : सोमवारी लागोपाठ तिसऱ्या दिवशी शेवगाव तालुक्यास जोरदार पावसाने झोडपून काढले. वडुले बुद्रुक येथे घराची भिंत अंगावर पडून कासम कट्टुभाई शेख (वय ५५) ठार झाले. त्यांच्या पत्नी जरीना (वय ५०) गंभीर जखमी झाल्या. शेवगाव तालुक्याची व मराठवाड्याची जीवनरेखा असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ७२ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांच्या तुलनेत धरण यंदा प्रथमच १०० टक्के भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी दिवसभर अधूनमधून सुरू असलेल्या या पावसामुळे जवळपास सर्वच जलसाठे ओव्हरफ्लो झाले. नद्या, ओढे, नाले भरभरून वाहत आहेत. कपाशी, बाजरी, तूर तसेच भाजीपाला आदी पिके पाण्याखाली गेल्याने ती पूर्णपणे वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे अनेक गावात घरे पडल्याच्या दुर्घटना घडल्या. पावसाचे पाणी घरात तसेच झोपड्यात शिरल्याने अनेकांना इतर सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याची वेळ आली. तालुक्यातील वडुले बुद्रुक येथे घराची भिंत अंगावर पडून कासम शेख हे भिंतीखाली दबून ठार झाले. सलग तिसऱ्या दिवश्ी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरांची तसेच झोपड्यांची पडझड झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. पशुधनाचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली. सामनगाव येथील ओढ्याला पाणी आल्याने रविवारी रात्रभर या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. अनेक गावांचा तालुक्यांशी संपर्क तुटला होता. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने बाजरीचे पीक लोळून कणसे पिवळी पडली आहेत. कपाशीची पाने पिवळी पडून सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. भाजीपाल्याचीही दुरावस्था झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात अति पाण्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याचा धोका निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.(तालुका प्रतिनिधी)
आजारांची विक्री; तरीही एफडीए गप्पच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2016 00:14 IST