‘अमृत’चा गोरखधंदा : संस्थेवर कारवाईचा फास प्रदीप भाकरे अमरावती सुरक्षारक्षकांच्या अल्प मानधनातून ४९.११ टक्के रक्कम कपात करून स्वत:चे उखळ पांढरे करणाऱ्या ‘अमृत’ने सुरक्षारक्षकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. कर्मचारी राज्य विमा निगम ‘ईएसआयसी’च्या नावाखाली महिन्याकाठी ६.५० टक्के रक्कम कपात केली जाते. मात्र त्या मोबदल्यात मागील ११ महिन्यांमध्ये एकाही कामगाराला ईएसआयसीचा लाभ मिळालेला नाही. महापालिकेला सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या ‘अमृत’ या संस्थेने हा गोरखधंदा चालविला आहे. करारनाम्यानुसार महापालिकेकडून प्रतिसुरक्षारक्षक ८७२६ रुपये मानधन दिले जाते. मात्र अमृत ही सुरक्षारक्षक पुरविणारी संस्था त्या मानधनातून २५.६१ टक्के भविष्य निर्वाह निधी ‘पीएफ’,६.५० टक्के ईएसआयसी ,१५ टक्के सेवा कर आणि २ टक्के अन्य कर अशी एकत्रित ४९.११ टक्के रक्कम कपात करीत असल्याचा दावा करते. प्रत्यक्षात सुरक्षारक्षकांच्या हातात मिळणारी रक्कम फारच अल्प आहे. ‘अमृत’ ही संस्था कपात केलेली रक्कम संबंधित खात्यात जमा करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्मचारी राज्य विमा निगम ‘ईएसआयसी’कडून कर्मचाऱ्यांना वेद्यकीय लाभ दिला जातो. यात आजारपण लाभ, मातृत्व लाभ, अपंगत्व लाभ, दफन खर्च, वैद्यकीय बोनस, वृद्धांची काळजी व पुनर्वसन आदी लाभ दिला जातो. त्यासाठी संबंधित व्यवस्थापन कामगारांच्या मासिक वेतनातून विशिष्ट रकमेचा ईएसआयसीकडे भरणा करते. योगदान काळावर वैद्यकीय लाभ अवलंबून असतो. याअनुषंगाने महापालिकेला सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या अमृत या संस्थेकडून ६.५० टक्के रक्कम सुरक्षारक्षकांच्या मानधनातून कपात केली जाते. प्रतिसुरक्षा रक्षक ५६७.१९ रुपये महिन्याकाठी कपात केली जाते. १५७ सुरषारक्षकांच्या मानधानातून कपातीचा तो आकडा ८९ हजार ४८ रुपयांवर जातो. ११ महिन्यांचा हिशेब केल्यास ‘ईएसआयसी’पोटी सुरक्षा रक्षकांच्या मानधनातून आतापर्यंत ९ लाख ७९ हजार ५३७ रुपये कपात केल्या गेलेत. त्याचा कुठलाही हिशेब महापालिकेतील जीएडीसह लेखाविभागाकडे नाही. एवढेच काय तर १५७ पैकी एकाही सुरक्षा रक्षकाला इएसआयसीच्या माध्यमातून ‘अमृत’ने वैद्यकीय लाभ दिलेला नाही. मागील ११ महिन्यांपासून बिनबोभाट हा नाडवणुकीचा गोरखधंदा सुरू आहे.
सुरक्षा रक्षकांच्या आरोग्याशी खेळ !
By admin | Updated: December 25, 2016 00:14 IST