एफडीएचे दुर्लक्ष : नागरिकांची लूट, आरोग्यास धोकावैभव बाबरेकर अमरावतीशहरातील बाजारपेठेत निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ व फळांची विक्री जोरात सुरु असून नागरिकांची लूट होत आहे. अन्नपदार्थ व फळांचा दर्जा तपासण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागाची आहे. मनुष्यबळाच्या अभावामुळे याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या विक्रेत्याजवळील मालाची तपासणी होत नसल्यामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. शहरातील खाद्यपदार्थ व फळ विक्रेत्यांना एफडीएच्या नियमावलीचे पालन करणे गरजेचे असते. मात्र, अर्धाअधिक व्यापारीवर्ग नियमांचे पालन न करता ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ व फळांची विक्री करीत आहे. त्यातच हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ व फळविक्रेते सर्रास नियमांना डावलून विक्री करीत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. शहरात शेकडो व्यवसायिक अन्नपदार्थांची विक्री करताना स्वच्छतेबाबत काळजी घेत नाहीत. पाण्याची शुद्धता तपासली जात नाही. अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री करण्यात येते. या अव्यवस्थेतून विक्रेते नागरिकांच्या आरोग्यांशी खेळ खेळत आहेत. त्याचप्रमाणे फळविक्रेते व भाजीपाला विक्रेतेही निकृष्ट दर्जाच्या मालाची विक्री करीत आहेत. ग्राहक विक्रेत्यांवर विश्वास ठेवून फळे किंवा भाजीपाला खरेदी करतात. मात्र, घरी गेल्यानंतर तीच फळे किंवाभाजीपाला निकृष्ट असल्याचे आढळून येते. त्यामुळे विक्रेते ग्राहकांची सर्रास लूट करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. हातगाडीधारक विक्रेते दररोज जागा बदलत असल्यामुळे फसवणूक झालेला ग्राहक पुन्हा त्या विक्रेत्याचा शोध सुद्धा घेऊ शकत नाही. अशाप्रकारे ग्राहकांची शहरात दररोज फसवणूक केली जात आहे. मात्र, या व्यवसायिकांची तक्रार करावी तरी कुणाकडे, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे. शहरातील खाद्यपदार्थ व फळे-भाजीपाला विक्रेत्यांजवळील मालाची तपासणी करण्याचे काम अन्न व औषधी प्रशासनाचे आहे. मात्र, शहरात निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ व फळे-भाजीपाल्याची विक्री होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री शहरातील अनेक ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री केली जात आहे. हे खाद्यपदार्थ झाकून न ठेवता तशीच विक्री केली जात असून नागरिक सुद्धा त्या खाद्यपदार्थांवर ताव मारताना आढळून येतात. ही बाब आरोग्यसाठी घातक आहे. आजार बळावण्याची शक्यता दूषित किंवा उघड्यावरील खाद्यपदार्थ अथवा फळे-भाजीपाला खाल्ल्यास टायफाईड, डायरीया, उलट्यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी दूषित किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.दूषित पाणी, खाद्यपदार्थ किंवा फळे-भाजीपाला खाण्यात आल्यास डायरीया, उलट्या, टायफाईडसारखे आजार बळकावू शकतात. -उज्ज्वला मोहोड, वैद्यकीय अधिकारी, इर्विन रुग्णालय. खाद्यपदार्थ व फळ विक्रेत्यांजवळील मालाची नियमित तपासणी सुरुच असते. या विक्रेत्यांजवळील माल निकृष्ट दर्जाचा आढळल्यास कारवाई सुद्धा करण्यात येते. ज.रा.वाणे, प्र.सहा.आयुक्त (एफडीए)
निकृष्ट खाद्यपदार्थ, फळांची विक्री
By admin | Updated: September 8, 2016 00:14 IST