२० दिवसांपासून वाहतुकीची ऐसीतैसी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
रिद्धपूर : गावातील जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी २० दिवसांपासून रस्त्यात खोदून ठेवलेल्या खड्ड्यात सांडपाणी भरले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे काम तातडीने पूर्ण केले जावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत नऊ कोटी रुपयांचे काम सुरू आहे. विश्रोळी ते रिद्धपूर दरम्यान जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. परंतु, गावातील आरोग्य केंद्र ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत जोडणी राहिली आहे. संबधित ठेकेदाराने त्यासाठी २० दिवसांपूर्वी गावातील मुख्य रस्त्यावर खोदकाम केले. त्यातून निघालेला मलबा रस्त्यावरच टाकल्यामुळे आरोग्य केंद्रात ये-जा करण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खोदकाम केलेल्या ठिकाणी जुन्या पाईप लाईनचा व्हॉल्व्ह व सांडपाण्याची नाली आहे. त्या पाण्याला अडथळा झाल्याने पाणी व्हॉल्व्हमध्ये शिरून घरोघरी पोहोचत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, अशी आहाद खान यांच्यासह नागरिकांची मागणी आहे.
---------
पाईप लाईनची टेल पीस उपलब्ध नसल्याने ते काम पूर्ण झाले नाही. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येईल.
- नरेंद्र शेळके, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण