अंजनगावचे महिला बचत गट आक्रमक : जिल्हा परिषद सीईओंसमोर मांडल्या समस्या अमरावती : सुवर्ण जयंती ग्राम स्वयं रोजगात योजनेअंतर्गत बचत गटाचे समूह कर्ज प्रकरणातील अन्याय दूर करावा या मागणीसाठी सोमवारी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील महिला बचत गटांनी प्रहारच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेत धडक दिली. यावेळी सीईओ सुनील पाटील यांच्यासमोर अडचणी मांडून यावर तोडगा काढण्याची मागणी केली.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बचत गटांना सुवर्ण जयंती ग्राम स्वयं रोजगार योजनेअंतर्गत विविध उद्योगासाठी समूह कर्जाचा पुरवठा केला जातो. सन १०१०/११ आणि ११/१२ मध्ये या बचत गटांना सुमारे २५ हजार ते २ लाख ५० हजार रूपयापर्यंतचे कर्ज मंजूर करण्यात आले. यापैकी काही बचत गटांनी नियमित कर्जाची परत फेडही केली आहे. मात्र त्यांना या कर्जावर मिळणारी अनुदानाची रक्कम मिळाली नाही.यात अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ११ बचत गट नवीन कर्जापासून वंचित आहेत. याबाबत प्रहारचे पंचायत समिती सदस्य प्रदीप निमकाळे यांनी पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद आणि संबंधित बँकांकडे लेखी पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने दखल घेतली नसल्याने २० जुलै रोजी शिदोरी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यानुसार तालुक्यातील माता जिजाऊ, श्री लक्ष्मी, एकता, जय दुर्गा, गायत्री, त्रिरत्न, साईबाबा, प्रियदर्शनी मयावती, आदिवासी, मुक्ताई आदी बचत गट प्रशासनाच्या समन्वयाअभावी अनुदानापासून वंचित राहिले. परिणामी या बचत गटांना शासनाचे अनुदान मिळू शकले नाही. अखेर या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी लिड बँकेचे व्यवस्थापक अनंत खोरगडे, व एस बी.आयचे मुख्य व्यवस्थापक एस. के.सिंग यांना बोलावून या मुद्दावर चर्चा केली. यावेळी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. ज्या बचत गटांनी कर्जाचा रितसर भरणा केला अशा व नव्याने मंजूर कर्जाचा पुरवठा त्वरित करण्याची सूचना बँक अधिकाऱ्यांना केली आहे. मंजूर कर्जाची रक्कम परिपूर्ण बँकेने दिली नाही. याबाबत विस्तृत माहिती सादर करण्याचे आदेश डीआरडीएला दिले. यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, जोगेंद्र मोहोड, पं.स.सदस्य प्रदीप निमकाळे, अवि टाक, सनि शळके, राजू पडोळे व महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)महिला बचत गटातील कर्ज प्रकरणाचा आढावा मंगळवारी होणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्याच्या बैठकीत घेतला जाईल आणि सर्व बचत गटातील अर्ज, वसुली आणि वाटप याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल - सुनील पाटील,सीईओ, जिल्हा परिषद.
समूह कर्जप्रकरणातील अन्याय दूर करा
By admin | Updated: July 21, 2015 00:13 IST