अमरावती : मार्च महिन्यातील लॉकडाऊनला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यात कोरोनाचा आलेख माघारला आहे. चाचण्यांमध्ये ३८ टक्क्यांपर्यंत गेलेली पॉझिटिव्हिटी आता १० टक्क्यांच्या आत आली आहे. त्यामुळे ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सोमवारपासून सुरू केलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची मागणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली.
कोरोनाग्रस्तांची त्यावेळची वाढती संख्या पाहून अमरावती जिल्ह्यात यापूर्वीच लॉकडाऊन लागू होते. त्यानंतर बाधितांच्या संख्येत घट झाल्याने निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले. आता राज्य शासनाकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. तथापि, अमरावतीत यापूर्वीचे लॉकडाऊन व रुग्णसंख्येत झालेली घट पाहता, नव्या अधिसूचनेचा पुनर्विचार करणे आवश्यक वाटते. त्यामुळे अमरावती जिल्ह्यासाठी अधिसूचनेतील निर्बंध शिथिल करावेत व व्यापारी यांना त्यांच्या कालावधीत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असे निवेदनात नमूद आहे.
मागच्या महिन्यातील लॉकडाऊनला व्यापारी वर्गाने मोठा प्रतिसाद दिला आहे. आता हळूहळू येथील स्थिती सुधारून लॉकडाऊन खुले होत असतानाच पुन्हा नवे निर्बंध आल्याने व्यापारी व नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. अनेक उद्योग व्यवसाय बंद राहून नुकसान होत आहे. त्यामुळे
अमरावती जिल्ह्यासाठी अधिसूचनेतील निर्बंध शिथिल करावेत व व्यापारी बांधवांना त्यांच्या कालावधीत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे
बॉक्स
रुग्णसंख्या अन् पॉझिटिव्हिटीचा ग्राफ माघारला
जिल्ह्यात २० ते २८ फेब्रुवारी दरम्यान रुग्णसंख्या ६०० ते ८०० होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केले. साथ लक्षात घेऊन व्यापारी बांधव व नागरिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे मार्च व एप्रिलमध्ये ही संख्या रोडावत जाऊन अडीचशेपर्यंत घटली. २३ फेब्रुवारीला ३७.५ टक्क्यांवर असलेला पॉझिटिव्हिटी रेट ५ एप्रिलला ११.३ टक्क्यांपर्यंत घटला आहे. दरम्यान, गरज लक्षात घेऊन हळूहळू विविध व्यवसायांना परवानगी देण्यात आली. तत्पूर्वी, चाचणी बंधनकारक असल्याने त्यालाही व्यापारी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. निकषानुसार लसीकरणही गतीने होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.