लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एप्रिल ते जून हे तीन महिने रेल्वे गाड्यांमध्ये हाऊसफुल्ल असल्याचे फलक आरक्षण खिडक्यांवर झळकू लागले आहे. पुणे, मुंबई ‘नो रूम’ असल्याने उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणे आतापासून कठीण झाले आहे. जूनअखेरपर्यंत हीच परिस्थिती राहील, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे.हल्ली लग्नप्रसंगाने जोर धरला असून, रेल्वे गाड्यांमध्ये चिक्कार गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच १५ एप्रिलपासून काही शाळा- महाविद्यालयांना सुटी लागत असल्याने पालकांना सहल, पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन केले. मात्र, रेल्वे गाड्यात तीन महिने आरक्षण मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत मौजमजा, पर्यटनस्थळी जायचे असल्यास रेल्वेऐवजी खासगी वाहनांनी प्रवास करण्याचा प्रसंग अनेकांवर उद्भवणार असल्याचे रेल्वे गाड्यांच्या आरक्षण स्थितीवरून लक्षात येते. विशेषत: विदर्भातून पुणे, मुंबई, गोवा, गुजरात, दिल्ली मार्गे ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वे गाड्यांची संख्या जास्त असली तरी उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने ऐनवेळी आरक्षण मिळणे कठीण होते, हे वास्तव आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले अनेक जण उन्हाळ्यांच्या सुटीत नातेवाईक, आप्तेष्टांकडे येऊन काही दिवस घालवितात. मात्र, रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळेनासे झाल्याने मुंबई, पुणे येथून आपल्या गावी येणाऱ्यांना प्रवासाचा पर्याय शोधावा लागेल, असे चित्र आहे. १५ मार्चपासून पुणे, मुंबई मार्गे गाड्यांमध्ये ‘नो रूम’ दर्शविले जात असल्यामुळे आणखी तीन महिने प्रवाशांना या मार्गे ये-जा करताना कसरत करावी लागणार आहे. अमरावती-मुंबई, गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर- पुणे गरीब रथचे पुढील तीन महिने आरक्षण खिडक्यांवर ‘हाऊसफुल्ल’ झळकत आहे. तसेच हावडा- मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, हावडा- मुंबई मेल, हावडा- कुर्ला शालीमार एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येसुद्धा आरक्षण नाही, असे आरक्षण खिडक्यांवर झळकत आहे.समर स्पेशल ८ एप्रिलपासूनमध्य रेल्वे मुंबई विभागाने उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी प्रवाशांची गैरसोय टाळता यावी, यासाठी पुणे, मुंबई व गोवा मार्गे ये-जा करण्यासाठी ८ एप्रिलपासून समर स्पेशल गाड्या सुरू होणार आहेत. मुंबई, नागपूर रेल्वे स्थानकावरून या गाड्या धावणार असून, त्यांचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे.तिकिटांचा काळाबाजार कधी संपणार ?अमरावती किंवा बडनेरा रेल्वे स्थानकावर दरदिवशी तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांची संख्या ही शंभरी ओलांडणारी आहे. तिकिटांच्या काळाबाजारात आरक्षण खिडक्यांवरील कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी हेदेखील सामील असल्याचे सर्वश्रुत आहे. सकाळच्या रेल्वे तिकीट आरक्षणासाठी रात्रीलाच दलालांची माणसे खिडक्यांवर कब्जा करून ठेवतात. त्यामुळे सामान्य प्रवाशांना रेल्वे गाड्यांचे आरक्षण कसे मिळणार, हा संशोधनाचा झाला विषय आहे.
रेल्वेत आरक्षण हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:29 IST
एप्रिल ते जून हे तीन महिने रेल्वे गाड्यांमध्ये हाऊसफुल्ल असल्याचे फलक आरक्षण खिडक्यांवर झळकू लागले आहे. पुणे, मुंबई ‘नो रूम’ असल्याने उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणे आतापासून कठीण झाले आहे.
रेल्वेत आरक्षण हाऊसफुल्ल
ठळक मुद्देपुणे, मुंबई ‘नो रूम’ : लग्नप्रसंग, शाळा- महाविद्यालयांच्या सुटीचा परिणाम