हंगाम २०१४-१५ : २ हजार ६२० शेतकरी होणार लाभान्वित अमरावती : रबी हंगाम सन २०१४-१५ मध्ये पीक विमा योजना राबविण्यात आली होती. यामध्ये ३ हजार २५५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून ४ हजार ६२४ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यापैकी २ हजार ६२० शेतकऱ्यांना ३ कोटी २२ लाख ७३ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूूर करण्यात येणार आहे. अवेळी पाऊस, तापमान व आर्द्रता या हवामान घटकांच्या धोक्यापासून शेतीपिकांना संरक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत ही योजना जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील ३ हजार २५५ शेतकऱ्यांनी १३ लाख ९६ हजारांचा भरणा करुन ६ कोटी ९४ हजार रुपयांची विमा रक्कम संरक्षित केली. या आठवड्यात विमा कंपनीकडून २ हजार ६२० शेतकऱ्यांना ३ कोटी २२ लाख ७३ हजारांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ३ शेतकऱ्यांना ४ हजार रूपये मिळणार आहे. भातकुली तालुक्यात २८३ शेतकऱ्यांनी विमा काढला. यापैकी ५ शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळतील. चांदूररेल्वे तालुक्यात ४३ शेतकऱ्यांना ४० हजार रुपयांचा लाभ मिळेल. मोर्शी तालुक्यात ३ शेतकऱ्यांना ८ हजार, वरुड तालुक्यात ११ शेतकऱ्यांना ८ हजार, अचलपूर तालुक्यात २ शेतकऱ्यांना २ हजार, चिखलदरा तालुक्यात ५ शेतकऱ्यांना ५ हजार रुपये व अंजनगांव तालुक्यात १०६ शेतकऱ्यांनी विमा काढला होता यापैकी ३८ शेतकऱ्यांना १ लाख १९ हजार रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला. चार तालुक्यांना भोपळा नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ८३ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. मात्र, एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही. धामणगाव तालुक्यात ९१ शेतकरी, चांदूरबाजार तालुक्यात १४ शेतकरी व धारणी तालुक्यात एका शेतकऱ्याने विमा काढला होता. परंतु या तालुक्याला पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. दर्यापूर तालुक्यास ३ कोटी २० लाख खारपाणपट्टा असलेल्या दर्यापूर तालुक्यात हरभरा पिकाचे सर्वाधिक क्षेत्र होते. या तालुक्यात २ हजार ५१० शेतकऱ्यांनी ३ हजार ८७६ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यासाठी ११ लाख ५९ हजारांचा हफ्ता भरुन ५ कोटी ६३ लाख ९३ हजाराची रकम संरक्षित केली. यापैकी सर्वच शेतकऱ्यांना ३ कोटी २० लाख ८४ हजारांची नुकसान भरपाई मिळणार आहे.
रबी पीक विम्याचे मिळणार ३ कोटी २२ लाख
By admin | Updated: January 26, 2016 00:12 IST