अमरावती : शहरातील चपराशीपुरा, व्यंकय्यापुरा, बिच्छुटेकडी व आदर्श नेहरूनगर भागातील पक्के घर असणाऱ्या अतिक्रमणधारकांना येत्या दोन-तीन दिवसांत पीआर कार्ड मिळण्याची शक्यता आहे. सध्या ही प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात आहे. विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांनी यासंदर्भात वेळोवेळी घेतलेली आंदोलनाची भूमिका तसेच आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रक्रियेला आता गती आली आहे.
शासनाचे ६ मार्च २०१९ चे आदेशाप्रमाणे सन २०११ पूर्वी निवासी प्रयोजनार्थ केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात कच्चे घर असलेल्या अतिक्रमणधारकास आहे त्याच जागेवर नियमानुकूल करून भोगवटदार-२ अन्वये पट्टावाटप करण्याात येणार आहे. याशिवाय दुसऱ्या टप्प्यात पक्के घर असलेल्या अतिक्रमणधारकास पीआर कार्डवाटप करून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात येण्यात येणार आहे. याकरिता प्रभाग क्रमांक ८ मध्ये शासकीय जागेवर निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण केलेल्या अतिक्रमितांचे सर्वेक्षण करण्यात येऊन पीआर कार्ड देण्याची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. शासनादेशानुसार, एससी, एसटी, ओबीसी प्रर्वगातील अतिक्रमणधारकास कब्जे हक्काच्या रकमेची आकारणी करण्याात येणार नाही. उर्वरित प्रर्वगात मात्र पहिल्या ५०० चौरस फुटांपर्यंत आकारणी करण्यात येणार नाही. मात्र, ५०० ते १००० चौरस फुटांपर्यंत २५ टक्के आकारणी करून १५०० चौरस फुटांपेक्षा जास्त अतिक्रमण असल्यास ते निष्कासित करण्यात करण्यात येणार आहे.
बॉक्स
या भागात दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया
प्रशासनाच्या माहितीनुसार, चपराशीपुरा भागात ४२, व्यंकय्यापुरा भागात १६, बिच्छुटेकडी भाग १ व २ मध्ये ६४९ व आदर्श नेहरूनगर भागात ७९ कच्चे व पात्र अतिक्रमणधारक यांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया आता दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत या अतिक्रमणधारकास पीआर कार्ड मिळण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने सांगितले.