अनुभव ब्रह्म : ‘दहा माणसांच्या स्वयंपाकात शंभरांचे जेवण, अन्न तरीही शिल्लक’अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांनी लिहिलेल्या ‘अनुभव ब्रह्म’ या ग्रंथात विश्वमित्रांप्रमाणे प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य सांगितले आहे. दहा माणसांच्या स्वयंपाकात शंभर माणसे जेवण्याची ‘ऋद्धी’ वाचकांसाठी ग्रंथात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शंकर महाराज यांनी लिहिलेल्या ‘अनुभव ब्रह्म’ या ग्रंथात अनेक ठिकाणी भुवया उंचाव्यात अशी विधाने आहेत. लोकशाही, कायदा आणि संगणक युगात अद्भूत वाटाव्यात अशा सिद्धी, ऋद्धींची माहिती या ग्रंथात आहे. खुद्द शंकर महाराज हे त्या ग्रंथाचे लेखक असल्यामुळे लेखणाला गांभीर्य प्राप्त होते. 'अनुभव ब्रह्म' या १५७ पानांच्या ग्रंथातील एकविसाव्या प्रकरणात शंकर महाराज यांनी ‘नौगी ऋद्धी’ स्पष्ट केली आहे. ते लिहितात- ‘दहा माणसांच्या भोजनाच्या स्वयंपाकात शंभर माणसांनी पोटभर जेवण केल्यानंतरही स्वयंपाक जेवढाच्या तेवढाच शिल्लक राहतो. तो कमी झालेला आढळत नाही.’याच परिच्छेदात त्यांनी मन मोहित करण्याचे आणि इच्छामरणाचे सामर्थ्य सांगितले आहे. महाराज लिहितात- 'यश, लक्ष्मी, कीर्ती, औदार्य, शौर्य आणि कोणाचेही मन स्वत:च्या ठिकाणी मोहित करण्याचे सामर्थ्य असणे, असे षट्गुण ऐश्वर्य त्या योग्यांना प्राप्त होतात. त्यांची आयुष्य मर्यादा पुष्कळ वाढते. ज्याप्रमाणे पितामह भिष्माने मृत्यू शय्येच्यावेळी सहा महिनेपर्यंत तीक्ष्ण बाणांच्या शय्येवर आपला पार्थिव देह परिधान करून जीव सोडला नाही व स्वेच्छेने देह सोडला, त्याप्रमाणे इच्छामरणाचे सामर्थ्य योगी पुरुषांना प्राप्त होत असते.’इच्छामरणानंतर हाच परिच्छेद पुढे प्रतिसृष्टी निर्मितीचे गमक सांगतो. ‘एवढेच नाही तर तो हटयोगी पुरुष ज्याप्रमाणे विश्वमित्रांनी नवीन प्रतिसृष्टी निर्माण केली, तशीच नवीन प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य बाळगून असतो. हटयोगी पुरुषांना वरील सामर्थ्य प्राप्त होते.’महाराजांच्या भक्तांनी दिला ‘अनुचित प्रकारा’चा इशारापिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या भक्तांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांना दिलेल्या निवेदनातून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला ‘अनुचित प्रकारा’चा गर्भीत इशाराच देवून टाकला. नंदुसेठ चव्हाण, भास्कराव मोहोड, शिरीष चौधरी, बाळासाहेब दांगट, देवेंद्र वाल्हेकर, संतोष पोकळे, रामदास दांगट, सुधाकर बान्ते, शरद इंगळे, सुदाम नागपुरे यांच्या सह्यांनिशीच्या या सूचक निवेदनात ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होत असलेल्या वृत्ताबाबत ‘लोकमत’ आणि गणेश देशमुख यांच्यावर त्वरित कार्यवाही न केल्यास या पुढे कुठलाही अनुचित प्रकार घडला तर यास आम्ही कुणीही जबाबदार नाही, असा इशारा वजा धमकीच दिली आहे. विशेष असे की, इशारा देणारी ही वाक्ये मुद्दामच ठळकपणे लिहून अधोरेखित करण्यात आली आहेत.
प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्यही !
By admin | Updated: September 2, 2016 00:05 IST