दुुर्लक्ष : आश्वासने विरली हवेत
कावली वसाड : केंद्र व राज्य सरकार यांच्या विविध योजनेंतर्गत प्रत्येक गावात ‘गाव तिथे रस्ता’ याप्रमाणे शहरांना रस्त्याच्या माध्यमातून गावांना जोडण्यात आले. परंतु, अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील जुना धामणगाव ते कावली रस्ता मोठ्या प्रमाणात उखडल्याने वसाड येथील नागरिक वाठोडा मार्गाने ये-जा करू लागले आहेत. परंतु, वाठोडा ते वसाड तसेच वाठोडा ते मंगरूळ दस्तगीर फाटा या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. गव्हा निपाणी येथील नागरिक जुना धामणगाव ते अंजनसिंगी रस्त्याचे काम सुरू असल्याने कावली मार्गाने जातात. परंतु, हा रस्तादेखील मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने वाहना चालविणे ही तारेवरची कसरत होऊन बसली आहे. कावली ते पिंपळखुटा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असल्याने या रस्त्याने पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. पिंपळखुट्याची धामणगाव ही मुख्य बाजारपेठ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक या रस्त्याने ये-जा करतात. परंतु मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे चिंचपूर या गावावरून धामणगावकडे वळतात. या रस्त्यांची किमान डागडुजी करावी, अशी निवेदन देण्यात आली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही.
--------------------------