अमरावती : महापालिकेत स्थायी समितीत सदस्य नियुक्तीवरुन राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस वगळता अन्य पक्षात अंर्तगत धुसफूस असून राष्ट्रवादी, शिवसेना, बसपात गटनेतापदाचा वाद कायम आहे. स्थायी समितीत नवीन ८ सदस्य नियुक्तीचा वाद कोणते वळण घेणार हे निश्चित नाही. मात्र, सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्याच्या सादर याचिकेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.स्थायी समिती ही महापालिकेत अतिशय महत्त्वाची समिती आहे. या समितीला आर्थिकदृष्ट्या अनेक अधिकार मुंबई महापालिका अधिनियमानुसार बहुतांश अधिकार बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेतील प्रत्येक सदस्य हा स्थायी समितीत प्रवेशासाठी ‘जुगाड’ जमवितो. एकदा या समितीत प्रवेश मिळाला की, बरेच प्रश्न आपसुकच सुटतात, असा आजतागायतचा सदस्यांचा अनुभव आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आमसभेत नवीन ८ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यानंतर ६ मार्चपूर्वी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक प्रशासनाला घ्यावी लागेल. ही निवडणूक जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या १६ सदस्यांच्या स्थायी समितीतून नैसर्गिक प्रक्रियेनुसार ८ सदस्य बाहेर पडतील. या सदस्यांच्या जागी नव्याने ८ सदस्य राजकीय पक्षबलानुसार नियुक्त केले जाईल. सदस्य नियुक्तीला अवघे चार दिवस शिल्लक राहिले असताना न्यायालयीन वाद, गटनेत्यांची भांडणे आदी विषय हे सदस्य नियुक्तीला आडकाठी ठरणारे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता सुनील काळे की, अविनाश मार्डीकर? हा वाद अजूनही शमलेला नाही. १६ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात या वादावर अंतिम सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे. गटनेत्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निकाल दिला तरच राष्ट्रवादी काँग्रेस गटातून ‘स्थायी’मध्ये सदस्य नियुक्त केले जातील, अन्यथा हा वाद कायम राहील, असे चित्र आहे. एवढेच नव्हे तर शिवसेना, बसपातसुद्धा गटनेतेपदाचा वाद कायम आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेले शिवसेनेचे गटनेता दिगंबर डहाके आणि बसपाचे गटनेता अजय गोंडाणे हे स्थायी समितीत कोणत्या सदस्यांची नियुक्ती करतात, हे २० फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे जनविकास- रिपाइं गटावर आ. सुनील देशमुख यांचे वर्चस्व असून त्यांच्या निर्देशानुसार गटनेता प्रकाश बनसोड यांना स्थायी समितीत सदस्य म्हणून पाठवावे लागेल. भाजप गटात असलेले अपक्ष सदस्य अंबादास जावरे यांनी या गटात प्रवेश करताना पाचही वर्षे स्थायी समितीच लागेल? असा करार केला होता. या करारानुसार येत्या २० फेब्रुवारी रोजी नियुक्ती करावीच लागेल, असे जावरे यांचे म्हणणे आहे. एकमात्र काँग्रेसमध्ये उघडपणे वाद नसून पक्षनेता बबलू शेखावत यांच्याकडे स्थायीत प्रवेशासाठी सदस्यांनी ‘लॉबींग’ सुरु केली आहे. महापालिकेत काँग्रेसची सदस्य संख्या ३० असून स्थायी समितीत तीन सदस्य नव्याने पाठवावे लागणार आहे. त्यानुसार पक्षनेता बबलू शेखावत यांनी चाचपणी सुरु केली आहे. आतापर्यंत ज्या सदस्यांना कोणतीही समिती मिळाली नाही, अशा सदस्यांना ‘स्थायी’मध्ये नियुक्तीबाबतचा विचार काँग्रेसने सुरु केला आहे. नुकतीच उन्हाळ्याची चाहुल सुरु झाली असून महापालिकेतसुद्धा स्थायी समितीत सदस्य नियुक्तीवरुन राजकारण तापायला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.
महापालिकेत ‘स्थायी’ वरुन राजकारण
By admin | Updated: February 16, 2015 00:14 IST