अमरावती : अपहरण प्रकरणात आग्रा येथील मुलीला नेण्यास आलेले उत्तर प्रदेशातील एतमादौला ठाण्याच्या पोलिसांना रीत्या हाताने परतावे लागले. एतमादौला पोलिसांनी पीडित मुलीला नेण्यासाठी अमरावती न्यायालयात ट्रान्झीट रिमांड मागितला होता. या अनुषंगाने पीडितेकडून विश्वास वैद्य यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यानंतर २८ जानेवारी रोजी न्यायदंडाधिकारी (क्रमांक ४) यांच्या न्यायालयाने एतमादौला पोलिसांची याचिका फेटाळून लावली.
अमरावतीच्या गाडगेनगर हद्दीतील एक तरुण आग्रा येथे काम करीत असताना, त्याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसूत जुळले. त्यानंतर ते दोघेही पळून अमरावतीत आले. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आग्रा जिल्ह्यातील एतमादौला पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला. या अनुषंगाने एतमादौला ठाण्यातील पोलीस पथक अमरावतीत पोहोचले. त्यांनी गाडगेनगर ठाण्यात रीतसर नोंद करून पीडित मुलीचा शोध सुरू केला. त्यावेळी पीडित मुलगी विवाहबद्ध असून, तिला एक अपत्य असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी मुलीला परत नेण्यासाठी जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात ट्रान्झीट रिमांड मागितला. परंतु न्यायालयाने ट्रान्झीट रिमांडची याचिका फेटाळून लावलेल्या युपी पोलिसांना आल्यापावली परतावे लागले.