संजय वानखडे : अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा एसपींना इशाराअमरावती : शकंर महाराज यांनी लिहिलेल्या 'अनुभव ब्रम्ह' या पुस्तकात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियमाचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार अॅड.संजय वानखडे यांनी पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्याकडे शुक्रवारी केली. सदर कारणासाठी शंकर महाराजांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. अटक न केल्यास पोलिसांविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही अॅड. वानखडे यांनी स्पष्ट केले आहे. पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात ११ वर्षीय प्रथमेशचा नरबळीच्या उद्देशाने गळा चिरण्यात आला. याप्रकरणात मंगरुळ दस्तगिर पोलिसांनी तीन आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे मातंग समाजाच्या भावना दुखावल्या. विविध संघटना व राजकीय पक्षांनी शंकर महाराजांना अटक करण्याची जोरदार मागणी केली. राज्यभरात आंदोलने पेटली. मोर्चे निघाले. परंतु लोकभावनेचा आदर केला नाही. शंकर महाराज व ट्रस्टच्या पदााधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक केली नाही. शंकर महाराज यांनी लिहिलेल्या 'अनुभव ब्रह्म' या पुस्तकात 'महिमा सिध्दी’ व ‘वाचा सिध्दी' प्राप्त करण्यासंबधिचे लेखन आहे. त्यामधील परिच्छेद क्र. ७ मध्ये ‘परकायेत प्रवेश करणे, मेलेला मनुष्य जिवंत करणे, तांबे किंवा गोटा याचेवर लघवी करताच त्याचे सोने तयार होणे, निर्जीव वस्तू भिंतीसारख्या चालविणे, पक्ष्याप्रमाणे आसन वर उठवणे, कोणी शस्त्र घेऊन मारण्याकरिता आला तर त्याचा हात तेथेच रोखणे किंवा तसाच चिकटून ठेवणे, भूत, भविष्य, वर्तमान ई. त्रिकालज्ञान प्राप्त होणे, जलवर्षाव होते वेळी काही ठिकाणी न होऊ देणे, पाण्यावरून चालणे, समुद्र हटविणे इत्यादी चमत्कार दाखविणे, असे पराक्रमरुपी मंत्रसामर्थ्य सांगितले आहे. त्यास महिमा सिध्दी म्हणतात.’ परिच्छेद क्रमांक ८ मध्ये शाप किंवा आशिर्वाद हे फलित होणे, ज्याप्रमाणे कोणाला पुत्र-धन देणे, कोणाचे फार मोठा नुकसान करणे, कुणाला मारुन टाकणे, कुणाला भस्म करणे इत्यादी क्रीया प्राप्त होतात, याला 'वाचा सिध्दी' असे म्हणतात. या हटयोगी अष्टसिध्दीच्या योगाने सामर्थ्य प्राप्त करतात.’ या बाबी शंकर महाराज लिखित पुस्तकात नमुद असल्याचे अॅड. संजय वानखडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या पुस्तकात लिहिलेल्या सर्व बाबी नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियमाचे उल्लघंन करणारे आहे. अधिनियमाच्या कलम ३ (२) मध्ये नरबळी आणि अमानुष, अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादूटोणा यांची जाहिरात आचारण किंवा प्रचालन केले तर, तो गुन्हा ठरतो, असे स्पष्ट नमुद केले आहे. त्याचप्रमाणे याच अधिनियमाच्या कलम २ (ग) नुसार प्रचार करण्याचा अर्थ नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांच्याशी संबधित किंवा त्या विषयी जाहिरात करणे, साहित्य, लेख किंवा पुस्तकांचे वितरण करणे किंवा ते प्रसिध्द करणे असा आहे. या अधिनियमातील अनुसूचिनुसार शंकर महाराज यांचे कृत्य हे कायद्याचे उल्लघंन करणारे आहे. पिंपळखुटा येथील आश्रमामुळे शंकर महाराज हे ट्रस्टचे सर्वेसर्वा असून ते शिष्यांना अशाप्रकारे अघोरी कृत्य करण्यास प्रवृत्त करीत असतात, त्यांच्या तोंडी आदेशाने व पुस्तकातील लिखाणावरून प्रथमेश सगणे याच्यावर नरबळीचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप अॅड. संजय वानखडे यांनी तक्रारीतून केला आहे.शंकर महाराज यांच्या अनुभव ब्रह्म या पुस्तकातील लिखाण जादुटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. त्यांच्या पुस्तकातील साहित्याचा अभ्यास केल्यावर प्रथमेश आणि अजय नरबळी प्रकरणामागील प्रेरणा शंकर महाराजच असल्याचे खात्री पटते. पोलिसांनी शंकर महाराजांना अटक न केल्यास न्यायालयात दाद मागू. - संजय वानखडे, वकील
‘अनुभव ब्रह्म’ पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण शंकर महाराजांच्या अटकेसाठी पोलीस तक्रार
By admin | Updated: September 2, 2016 23:58 IST