नांदगावात जलसंकट : नगरपंचायतीचा तुघलकी निर्णय मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वरचांदी प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा असूनसुद्धा शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यास आधीच असमर्थ ठरलेल्या नगरपंचायतच्या आणखी एका तुघलकी निर्णयाने नांदगावात जलसंकट निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नगरपंचायतीने वसतीगृहाला पाणीपुरवठा करण्यासाठी दिलेल्या एनओसीचा गैरफायदा घेत प्राधिकरणने सुरू केलेल्या पाइपलाईनच्या खोदकामाला पाणी बचाव समितीने वेळीच ब्रेक लावल्याने तुर्तास खोदकाम थांबले आहे. परंतु शहरवासियांवरील जलसंकटाची गडद छाया अद्यापही कायम आहे. लोकवर्गणीतून तसेच शासनाच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या कोट्यवधीच्या योजनेतून नांदगाववासीयांची तहान भागविण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाइपलाईनमध्ये झालेला भ्रष्टाचार व पाणीपुरवठा समितीच्या नियोजनशून्यतेमुळे शहरवासीयांची पाण्यासाठी तारांबळ होत आहे. मात्र, नगरपंचायतीने शहरवासीयांचा कुठलाही विचार न करता वसतिगृहाला पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. प्राधिकरणने याचा गैरफायदा घेत वसतिगृहापासून चार इंचाच्या पाईपलाइनचे खोदकाम सुरू करून शहरवासीयांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु येथील काही जागरूक नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी खोदकामाला विरोध करून पाईपलाईनचे काम बंद पाडल्याने तुर्तास शहरवासियांवरील जलसंकट टळले आहे. पाणीबचाव कृती समिती स्थापन करून राजेश पाठक, प्रकाश मारोटकर, शाम शिंदे, संजय पोपळे, सतीश पटेल, प्रमोद पिंजरकर, अरुण लहाबर, निकेत ब्राह्मणवाडे, शिवानी मेश्राम, मनोज बनारसे, सागर सोनोने यांचेसह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार सादर केली. जोपर्यंत शहरातील नागरिकांना दैनंदिन मुबलक पाणी मिळणार नाही तोपर्यंत इतरत्र पाणी न देण्याचा निर्धार पाणी बचाव कृती समितीने केला आहे.मुख्याधिकाऱ्यांचा अहवाल गावकऱ्यांच्या बाजूने, सत्ताधारी मात्र गुलदस्त्यात पाणी बचाव कृती समितीच्या तक्रारीनुसार नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व प्राधिकरणकडे खोदकाम बंद करण्याबाबत अहवाल पाठवून नागरिकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी मात्र अद्यापही गुलदस्त्यात असून ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ अशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांची झाली आहे.
पाणी बचाव कृती समितीने रोखले पाईपलाईनचे खोदकाम
By admin | Updated: June 20, 2016 00:08 IST