राष्ट्रीय कृषी पीक विमा : योजनेत १ लाख ४३ हजार शेतकऱ्यांचा सहभागअमरावती : नैसर्गिक आपत्ती तसेच किडी व रोग यापासून शेती पिकांना संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ५६३ शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. यासाठी ६ कोटी ६६ लाख ३१ हजार रूपयांचा भरणा वित्तीय संस्थांकडे केला आहे. खरीप हंगाम २०१५ साठी राष्ट्रीय कृषि पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात आली. या योजनेत जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप ज्वारी, भात, उडीद, मूग, तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीन व कपाशी या पिकासाठी १ लाख ३४ हजार ८३५ हेक्टर क्षेत्र संरक्षित केलेले आहे. खरीप ज्वारीसाठी २ हजार ५५९ शेतकऱ्यांनी १ हजार ८२५ क्षेत्रासाठी ३ लाख ६४ हजार रुपयांचा भरणा केला आहे. भातासाठी १ हजार १९२ शेतकऱ्यांनी ५६१ हेक्टरसाठी १ लाख ४३ हजार रुपयांचा भरणा केला आहे. उडीदासाठी १ हजार ४४६ शेतकऱ्यांनी १ हजार १२६ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले. यासाठी १ लाख ४३ हजार रूपये विमा हप्ता भरला आहे. मुगासाठी १५ हजार ४७५ शेतकऱ्यांनी १८ हजार ८४० हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा काढला. यासाठी ४४ लाख ८६ हजार रूपयांचा विमा हप्ता भरलेला आहे. तूर पिकासाठी २८ हजार ३४२ शेतकऱ्यांनी १० हजार ५३५ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले यासाठी ३५ लाख ४५ हजारांचा भरणा केलेला आहे. सोयाबीनसाठी ७६ हजार ६७१ शेतकऱ्यांनी ८६ हजार ५८५ हेक्टर क्षेत्र विम्यासाठी संरक्षित केले. यासाठी ३ कोटी ५० लाख ३२ हजार रुपयांचा भरणा केलेला आहे. कपाशी पिकासाठी १७ हजार ८३७ शेतकऱ्यांनी १५ हजार ३४० हेक्टर क्षेत्रासाठी २ कोटी २७ लाख ७८ हजार रुपयांचा भरणा वित्तीय संस्थेकडे केला आहे. यंदा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे खरिपाचा हंगाम उद्धवस्त झाला. शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत असल्यामुळे विमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. (प्रतिनिधी)
खरीप पीक विम्यासाठी साडेसहा कोटींचा भरणा
By admin | Updated: December 8, 2015 00:14 IST