२३ जूनपासून प्रक्रिया : २६०० विद्यार्थी क्षमताअमरावती : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होताच पुढील शिक्षणासाठी प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली आहे. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी २३ जूनपासून आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे.अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, या अनुषंगाने शासनाने जिल्ह्यात समाजकल्याणचे ११ वसतिगृहे मुलांची तर ११ वसतिगृहे मुलींची उपलब्ध करुन दिली आहेत. यापूर्वी काही वसतिगृहांत इयत्ता आठवीपासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येते. मात्र दहावीचा निकाल लागताच नवीन प्रवेशप्रक्रिया शासन निर्णयानुसार घेण्याची तयारी समाजकल्याण विभागाने चालविली आहे. आॅनलाईन प्रवेश हा इयत्ता अकरावी व पदवीच्या पहिला वर्गापासून दिला जाणार आहे. वसतिगृहाच्या प्रवेशासाठी पासवर्ड हा शिष्यवृत्तीच्यावेळी असलेला पासवर्ड ठरविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरताना वसतिगृहाच्या प्रवेशासाठी शिष्यवृत्तीचाच पासवर्ड टाकावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी. बी. नाईक यांनी केले आहे.
समाजकल्याण वसतिगृहात आॅनलाईन प्रवेश
By admin | Updated: June 21, 2014 23:48 IST