रामदास आठवले : सामाजिक न्याय विभागाची बैठक अमरावती : जिल्ह्यात अपंगांची संख्या ७७ हजार आहे. त्यांचे जीवन सुखी व समृद्ध करण्याच्या दृष्टीने अपंगांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.शासकीय विश्रामगृहात रविवारी ना. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी विविध विभागांतील कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, महापालिका आयुक्त हेमंत पवार, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, ग्रामीण पोलीस अधीक्षक लखमी गौतम, विभागीय समाजकल्याण अधिकारी दीपक वडकुते, विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी भीमराव खंडाते, सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त प्राजक्ता इंगळे, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी ना. आठवले यांनी विभागात सामाजिक न्याय विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत ग्रामीण व शहरात दाखल गुन्ह्यांसंदर्भात तसेच झालेल्या प्रगतीबाबत आढावा घेतला. पोलीस आयुक्त मंडलिक म्हणाले, शहरात चालू वर्षात या कायद्यांतर्गत २८ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्काराचे ६ विनयभंगाचे ७, शिवीगाळ व अन्य शिविगाळीच्या संदर्भात १४ प्रकरणे आहेत. मागील वर्षी ३३ प्रकरणे व सन २०१४ मध्ये २० प्रकरणे दाखल होती. पोलीस अधीक्षक लखमी गौतम म्हणाले, चालू वर्षी एकूण ८३ गुन्हे दाखल आहेत. सन २०१४ मध्ये ७३ आणि सन २०१५ मध्ये ८३ गुन्हे दाखल होते. त्याची यावेळी तपशिलवार माहिती मंत्र्यांना देण्यात आली. मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी रमाई आवास योजनेंतर्गत झालेल्या कामकाजाची माहिती दिली. मेळघाटातील कुपोषण कमी करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी दिली. जात प्रमाणपत्र पडताळणीचे दरमहा १५०० ते २५०० प्रकरणे दाखल होतात. यात प्रलंबित प्रकरणे फारशी नसल्याचे रविंद्र ठाकरे यांनी सांगितले. जिल्ह्यात २४८८८ विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिष्यवृत्ती देण्यासाठी नोंदणी झाली आहे. ‘फ्रीशिप’ शिष्यवृत्तीची १,६६१ प्रकरणे असल्याची माहिती सहायक आयुक्त प्राजक्ता इंगळे यांनी दिली. ना. आठवले यांनी याबाबत काही महत्त्वाच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. (प्रतिनिधी)
अपंगांच्या कल्याणासाठी ‘एनजीओं’चा पुढाकार आवश्यक
By admin | Updated: October 10, 2016 00:12 IST