आंदोलनाचा इशारा :
नेरपिंगळाई : येथील मध्यवस्तीतून जाणारा रिद्धपूर-तिवसा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. या रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरू झाल्याने या रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवा, असे निवेदन पालकमंत्री यशोमती ठाकूर व बांधकाम विभागाला प्रहारकडून देण्यात आले.
गावातून जाणारा रिद्धपूर-तिवसा रस्ता इंदूर राज्य मार्गाशी जोडला असल्याने, या रस्त्यावर अहोरात्र जड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यात हा रस्ता गावात अतिशय अरुंद आहे. त्यावर अतिक्रमण झाल्याने दोन जड वाहने पास होताना अपघाताची भीती राहते. पादचाऱ्यांना या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सन २०१३ मध्ये मजुरी करून घरी परतणाऱ्या एका महिलेचा ट्रकखाली मृत्यू झाला होता. यंदा सुधाकरराव देशमुख यांचासुद्धा ट्रकखाली येऊन जागीच मृत्यू झाला. हा रस्ता ३०० मीटरपर्यंत मंजूर झाला असल्याने व त्याचे बांधकाम सुरू असल्याने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तथा प्रहार रुग्ण समितीचे रूपेश गणेश यांनी केली आहे.
----------