अमरावती: लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आ. रवी राणा यांच्या नेतृत्वात महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बुधवारी भेट घेतली. एलबीटी, भारनियमनमुक्ती, औद्योगिक विकास, शेतकर्यांना अतवृष्टीची मदत आदी विषयांवर शिष्टमंडळाने लक्ष वेधले.मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आ.रवी राणा, उपमहापौर नंदकिशोर वर्हाडे, गटनेता सुनील काळे, आशा निंदाणे, जयश्री मोरय्या, प्रवीण मेश्राम, सपना ठाकूर या सदस्यांनी चर्चेत सहभागी होताना महापालिकेतून एलबीटी हद्दपार करण्यात यावा, ही मागणी रेटून धरली. रवी राणा यांनी एलबीटी मुद्यावर आक्रमक होत हा कर हटविला गेला नाही तर शहरात विकास खुंटणार ,अशी भीती व्यक्त केली. अमरावती आणि मेळघाटात सुरू असलेले भारनियमन बंद करण्यात यावे, गारपीटग्रस्तांना आर्थिक मदत व कर्जमाफ करावी, इन्फ्रास्ट्रक्चर निविदा प्रक्रिया राबवून जिल्ह्यातील ६ हजार ५00 शेतकर्यांना कृषिपंप विद्युत जोडणी, शेतकर्यांना बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके पेरणीच्या १५ दिवसांपूर्वी शेतकर्यांना घरपोच पुरवठा व्हावा, पिकांसाठी तातडीने कर्ज मिळावे, खारपाण पट्टय़ातील दालमिलचे अनुदान ७0 हजारांहून १ लाख २५ हजार र्मयादा करावी, आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना ५ लाख रूपये शासन अनुदान आणि विमा लाभ मिळावा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे आदी समस्यांवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.यावेळी अजय मोरय्या, बाबुलाल निंदाणे, शैलेश ठाकूर, अचलपूरचे नगराध्यक्ष अरूण वानखडे, विनोद गुहे, गजानन रेवाळकर, सचिन भेंडे, अविनाश काळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे नगरसेवक मुख्यमंत्र्यांना भेटले
By admin | Updated: May 8, 2014 00:51 IST