नियमित पदस्थापना केव्हा ? : महापालिकेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला अमरावती : दहा हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गोतावळा सांभाळणारा महापालिकेचा शिक्षण विभाग नियमित शिक्षणाधिकाऱ्यांविना पांगळा झाला आहे. दोन वर्षांपासून शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीवरील बदलणारे चेहरे पाहिल्यास या महत्त्वपूर्ण पदाची कशी संगीतखुर्ची झाली याची कल्पना येऊ शकते. पालिका शाळांकडे दारिद्र्यरेषेखालील व वंचितांच्या शाळा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन मागील १० ते १२ वर्षांपासून अधिक वृद्धींगत होत चालला आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या पाहता व विद्यार्थ्यांची नाजूक आर्थिक परिस्थिती पाहता लक्षावधींचे शुल्क ज्याला परवडत नाही तेच पालक आपल्या पाल्यांना महापालिकाचे शाळांमध्ये टाकतात, असे चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच या शाळांची अवस्था फार बिकट झाली आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि किमानपक्षी पाठपुरावा करण्यासाठी कुटुंबप्रमुखांची नितांत गरज आहे. मात्र मागील २ ते अडीच वर्षांपासून शिक्षण विभागाचा डोलारा सांभाळण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणाधिकाऱ्याची, कुटुंबप्रमुखांच्या खुर्चीतच स्थिरता नाही. अपवाद वगळता पालिका शाळांची बकाल अवस्था, चुकीच्या पदोन्नत्या, चुकीच्या बदल्या, रखडलेली बिंदुनामावली आणि सेवा पुस्तिकांचे रखडलेले अद्ययावतीकरणासाठी येथे नियमित शिक्षणाधिकाऱ्यांची गरज आहे. महापालिका शाळांमधील काही शिक्षकांची मिरासदारी मोडीत काढत या विभागाला ताळ्यावर आणण्यासाठी नियमित तथा शासनाकडून येणाऱ्या खमक्या नेतृत्वाची गरज आहे. बनावट पटसंख्या दर्शवून स्वत:ची खुर्ची वाचविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शिक्षण विभागाला कर्त्या आणि दूरदृष्टीच्या कुटुंबप्रमुख मिळाल्याशिवाय तूर्तात असलेल्या बकाल अवस्थेत फारसी सुधारणा शक्य नाही. महापालिकेकडे सध्या ६७ शाळा, ११८०० विद्यार्थी आणि ३८० पेक्षा अधिक शिक्षक आहेत. (प्रतिनिधी)२०१४ पासून प्रभारींकडे धुरामहापालिकेच्या स्थापनेपासून ३१ मार्च २००२ पर्यंत शासनाने पाठविलेल्या अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारीपदाची सूत्रे सांभाळली. त्यानंतर शासनाने अधिकारी न पाठविल्याने महापालिका आस्थापनेवर काम करणाऱ्या व्यक्तिंकडे हा पदभार देण्यात आला. यातील सविता चक्रपाणी यांनी १ एप्रिल २००२ ते ३१ डिसेंबर २०१४ अशा प्रदीर्घ काळात शिक्षणाधिकारी म्हणून धुरा वाहिली. त्यानंतर १ जानेवारी २०१५ ते ३१ जुलै २०१५ पर्यंत अरुणा डांगे, त्यानंतर ८ आॅगस्ट १५ ते ६ डिसेंबर १५ या कालावधीत अशोक वाकोडेंकडे चार्ज होता. त्यानंतर ७ ते २३ डिसेंबर या औटघटकेसाठी राजिक अहमद यांनी हे पद भुषविले. त्यानंतर पुन्हा १६ जानेवारीपर्यंत १५ दिवसांसाठी वाकोडे शिक्षणाधिकारी बनलेत. २१ जानेवारी २०१६ ला विजय गुल्हानेंनी पदभार स्वीकारला. मात्र त्यांचे कंत्राटी सहा महिने संपल्यानंतर सिस्टिम मॅनेजर अमित डोंगरे यांचेकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला. डोंगरेंचे काम बरे पण...सध्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी अमित डोंगरे हे उच्चशिक्षित असून त्यांनी शिक्षण विभागाच्या सुधारणेला वाव दिला आहे. मात्र महापालिकेत नव्यानेच दाखल झालेल्या डोंगरेंना हे पद सांभाळणार नाही, अशी हाकाटी पिटवणे सुरू झाली आहे. अमित डोंगरे यांना थेट विरोध न करता त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून आप्तेष्टांना हे पद कसे बहाल करता येईल, असा पद्धतशीर डाव महापालिकेत रंगतो आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांची संगीतखुर्ची !
By admin | Updated: October 5, 2016 00:25 IST