ग्रामीण भाग कोरडाच : अमरावतीकरांना उकाड्यापासून दिलासा अमरावती : शहरात रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली आणि उकाड्याने हैराण अमरावतीकरांना जरा वेळ दिलासा मिळाला. दुपारी ४ वाजता सुरू झालेला धुवांधार पाऊस तब्बल तासभर कोसळत होता. दिवसभर कडक उन्हाने तापलेल्या अमरावतीकरांना अकस्मात कोसळलेल्या पावसाने दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागावर मात्र वरूणराजाची वक्रदृष्टी कायम असल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन आहेत. तब्बल २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. एव्हाना पिकांनीही माना टाकल्या असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवसांत पाऊस न पडल्यास पिकांची हानी होऊ शकते. रविवारी शहरी भागात दमदार पाऊस कोसळल्याने नागरिक आनंदले. मात्र, शहरात नागरिकांची त्रेधा उडाली. ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य होते. जिल्हा स्त्री रूग्णालयातही पाणी साचले होते. (प्रतिनिधी)
शहरात तासभर मुसळधार
By admin | Updated: August 29, 2016 00:00 IST