फोटो पी ३० वनोजा
पान २ चे लिड
वनोजा बाग (अंजनगाव सुर्जी) : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीत सेसच्या मुद्यावरून प्रशासन विरुद्ध अडते असा सामना रंगला आहे. प्रशासनावर आडमुठ्या धोरणाचा आरोप करून अडत्यांनी बाजार समिती बंद केली. यात शेतकरी नाहक भरडला गेला.
सद्यस्थितीत तूर आणि हरभरा काढणीचा हंगाम सुरू आहे. बाजार समितीत तूर व हरभऱ्याची आवक वाढली आहे. २९ जानेवारी रोजी बाजार समितीत सेसच्या मुद्यावरून प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. व्यापाऱ्यांनी बाजार समिती सचिवाने घेतलेल्या बाजार फी (सेस) च्या भूमिकेविरोधात रोष जाहीर करीत कामकाज बंद केले. बाजार समितीत कृषिउत्पन्नाचे वजन किंवा मोजणी केल्यानंतर समितीने निश्चित केलेली बाजार फी भरणा करावी लागते. बाजार फी न दिल्यास संबंधित अडते, व्यापाऱ्याची अनुज्ञप्ती (लायसन्स) तहकुब करता येते. एकदा मार्केट फी दिल्यावर दुसऱ्यांदा ते शुल्क स्वतंत्र रीतीने वसूल करता येत नाही. बाजार समिती सचिवाने एकाच मालाची बाजार फी भरल्यावरही त्याच मालाची बाजार फी भरावी म्हणून नोटीस दिली. त्यातूनच उपरोक्त प्रकार घडला, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सदर प्रकरणावरून व्यापारी, अडते आणि बाजार समिती सचिवांमध्ये वाद झाला. वाद विकोपास जाऊन सर्व अडते, व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत कामकाज बंद केले. या वादविवादात शेतकऱ्यांची मात्र कुचंबणा झाली. अखेर प्रदीप निमकाळे व काही संचालकांनी मध्यस्थी करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यावर व्यापारी व अडत्यांनी आपले कामकाज सुरू केले.
कोट
ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीत शेतमाल विक्रीस आणला होता, त्यांचे मोजमाप मार्गी लागले. सेस कमी भरला म्हणून नोटीस देण्यात आल्या. नोटीसचे उत्तर द्यावयाला हवे होते. सेसबाबत संशय होता, तर विचारणा करावयाची होती. बाजार समिती बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नव्हते.
गजानन नवघरे, सचिव, बाजार समिती
कोट २
काम बंदच्या प्रकरणाला बाजार समितीचे सचिवच जबाबदार आहेत. एकदा भरलेल्या मालाच्या बाजार फीबाबत दुसऱ्यांदा नोटीस दिल्याने संबंधित प्रकार घडला. चुका करून नोटीस देणे व अनुज्ञप्ती रद्द करण्याच्या धमक्या देणे ही बाब योग्य नाही.
मो. सिद्दीक मो. सादिक, अडते, अंजनगाव सुर्जी
------------