मुलाखत : आदिवासींसाठी कार्य करण्याची रसिका धामणकरची इच्छासंदीप मानकर अमरावतीवऱ्हाडातील तरूणांना अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी फारसे व्यासपीठ मिळत नाही. परंतु येथील तरूणाई मोठी गुणी आहे. विपरीत स्थिती असली तरी वऱ्हाडातील तरूणाईने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर अभिनयक्षेत्रात करिअर करावे, असे प्रतिपादन मराठमोळी अभिनेत्री व वहिनीसाहेब मालिका फेम रसिका धामणकर हिने केले. शनिवारी अभिनेत्री रसिका धामणकर एका खासगी कार्यक्रमाकरिता अंबानगरीत आली असता तिने ‘लोकमत’ प्रतिनिधीसोबत संवाद साधला. रसिका ही उच्चविद्याविभूषित आहे. तिने आतापर्यंत वहिनीसाहेब, अनोळखी दिशा, भाग्यलक्ष्मी, होणार सून मी या घरची, लक्ष्य, सीआयडी, क्राईम पॅट्रोल यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून अभिनय केला आहे. पुढे बोलताना रसिका म्हणाली, ‘आदिवासी भागात एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान त्यांचे जीवनमान अनुभवले आहे. मूलभूत सुख-सुविधांपासून वंचित राहून आदिवासी कसेबसे जीवन जगतात. मुंबईत आमचा खंडारबोल्ड नावाचा ५० जणांचा ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आदिवासींची सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा आहे.’ रसिका ही मूळची वर्धा जिल्ह्यातील रोहणा येथील रविहासी. तिने इतिहासात एमए केले आहे. तर भोपाळ येथील खैरागड विद्यापीठातून तिने संगीताची पदवी घेतली. छिंदवाडा येथे इंडियन नेव्हीत कार्यरत विजय धामणकर हे रसिकाचे पती. सध्या रसिका ही मुंबईतील वाशी येथे एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून अभिनय क्षेत्रातही काम करते आहे. रसिका म्हणते की तिला संगीतक्षेत्रात करिअर करायचे होते. पण अनवधानाने अभिनयाकडे वळले. अंबानगरीबद्दल बोलताना ती म्हणाली की, तिला अंबानगरीचे विशेष आकर्षण आहे. येथील लोक फार प्रेमळ असल्याचे तिने आवर्जुन सांगितले. भविष्यात संधी मिळाली तर चिखलदरा, मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणात चित्रपट करणे आवडेल.
वऱ्हाडातील मराठी तरूणाईने अभिनय क्षेत्रात यावे
By admin | Updated: May 11, 2015 23:57 IST