नेरपिंगळाई : येथील शेतकरी विठ्ठल गुलाबराव दापूरकर यांच्या सावरखेड येथील तीन एकरांतील हरभरा पिकाचे रोहींनी प्रचंड नुकसान केले. शेताला तारेचे कुंपण असल्यानंतरसुद्धा रोही प्राण्यांनी कुंपण तोडून आत शिरून पिकाचे नुकसान केले. एकीकडे खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकांची निसर्गाने पूर्णत: वाट लावली. त्यानंतर आता रबी पिकांच्या उत्पन्नाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने शेतकऱ्यांना रात्र शेतात जागून काढाव्या लागत आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताकरिता दरवर्षी येथील शेतकरी संबंधित अधिकाऱ्यांकडे याचना करतात. परंतु वनविभागाने याकडे लक्ष दिलेले नाही. या परिसरातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी कळकळीची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.