परतवाडा:-- जागतिक व्याघ्र दिनी परतवाड्यात ‘शेरनी’ हा चित्रपट व्याघ्र प्रकल्पाकडून दाखविला गेला. हा चित्रपट टी-वन वाघीण (अवनी) च्या मृत्यूप्रकरणावर बनविला गेला. अवनीला वन्यजीव विभागाकडून ठार करण्यात आले होते. अवघ्या दोन वर्षांत तेरा माणसांना ठार केल्याचा अवनीवर आरोप लावण्या आला होता. यानंतर तिच्या छाव्यांना बेशुद्ध करून रेस्क्यू सेंटरला पाठविले गेले.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत या सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. यात मानव-वन्यजीव संघर्ष दाखविण्यात आला आहे. मेळघाटमध्ये वाघांविषयी काही प्रमाणात समज-गैरसमज बघायला मिळतात. गुराढोरांच्या चराईचा प्रश्न नेहमीच उद्भवतो. यात वन्यजीव अधिकारी व पशुपालकांन मध्ये नेहमीच संघर्ष बघायला मिळतो. पुनर्वसनाची समस्या मोठी आहे. वाघ सुरक्षित राहावा व वाघाला संरक्षण मिळावे, याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अनेक परिणामकारक उपायोजना केल्या जात आहेत. या चित्रपटात आयएफएस अधिकाऱ्याची प्रमुख भूमिका अभिनेत्री विद्या बालनने निभावली आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक म्हणून जयोती बॅनर्जी, तर मेळघाट वन्यजीव विभागाच्या डीएफओ म्हणून पीयूषा जगताप या आयएफएस अधिकारी आहेत. त्यांच्यावरही मेळघाटातील वाघांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी आहे. त्या ही जबाबदारी प्रभावीपणे सांभाळून आहेत. जागतिक व्याघ्र दिनी हा चित्रपट बघितल्यानंतर अनेकांच्या नजरेपुढे व्याघ्र प्रकल्प अंतर्गत कार्यरत महिला अधिकारी वाहत असलेल्या जबाबदारीचे भान आले.