७५ लाखांचा दंड वसूल : ४५ हजार वाहनचालकांवर कारवाई अमरावती : शहरात वाहन चालविताना कोण अचानक पाठीमागून किंवा समोर येऊन धडक देईल, याचा नेम नाही. कुणी लेनकट करतेय. कुणी एकेरी मार्गातून उलट दिशेने, तर नो एंट्रीचा फलक बघूनही वाहन दामटणारे, कुणी सिग्नल तोडून पुढे जाण्याच्या घाईत, तर काही झेब्रा क्रॉसिंगवरच थांबलेले.. तसेच दुचाकीवर मान वाकडी करून कानाला मोबाईल लावणारे वाहन चालक, रस्ता आपलाच आहे, कसेही जा, असे चित्र अमरावतीच्या रस्त्यावर सर्रास पाहायला मिळते. या बेशिस्त वागण्यामुळे अपघातात बळी जात आहेत. स्वत:सोबतच शिस्तीत जाणाऱ्या इतर वाहनचालकांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत शहर आयुक्तालयात ३०० हून अधिक छोटे मोठे अपघात झालेत. या अपघातामागे सर्वाधिक अपघात बेशिस्तपणे वाहन चालविल्यामुळे झाले आहेत. शहरात वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४५३४७ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून ७४ लाख ५३ हजार ८५० रुपये दंड वसूल करण्यात आला. यात सिग्नल तोडण्यासह बेधडक वाहने चालविणे, विनापरवाना वाहन, लेन कटिंग, मोबाईल टॉकिंगसह रस्त्यावर एकेरी मार्गातून विरुद्ध दिशेने जाणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. ११ महिन्यांत ४५ हजार वाहन चालकांवरील कारवाई व त्यांचेकडून वसूल केलेला ७५ लाखांचा दंड वाहतुकीचा बट्ट्याबोळ दर्शविते. शहरातील रस्ते लहान आणि वाहनांची संख्या मोठी अशा विचित्र प्रमाणामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा वाजतात, सकाळी प्रत्येकाला आॅफीस गाठायची तर विद्यार्थ्यांना शाळेत जायची घाई. सायंकाळी विशिष्ट वेळांमध्ये गर्दी वाढत असल्याने प्रत्येक जण जागा मिळेल तेथून आपले वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. अन् हळूहळू वाहतूक कोंडीत भर पडते. शहरातील रस्त्यांचा आधीच कोंडलेला श्वास नवी वाहने आणि अतिक्रमणाने आणखी व्यापला गेला आहे. (प्रतिनिधी)
बेशिस्त वाहतुकीमुळे जीव धोक्यात
By admin | Updated: December 26, 2016 00:25 IST