दिशाभूल : प्राथमिक केंद्रात अंतिम निदान शक्य नाहीअमरावती : अंजनसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने दिलेल्या माहितीच्या आधारेच अजय पाय घसरून पडल्याची माहिती आश्रमाने त्याच्या आईला दिल्याचे निवेदन आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी अमरावती येथील पत्रपरिषदेत केले होते; तथापि आश्रमानेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे अंजनसिंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजीव पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. अजय वणवे या विद्यार्थ्याचा शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमात दगडाने ठेचून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर अजय स्वच्छतागृहात पाय घसरून पडला, अशी धादांत खोटी माहिती आश्रमाने त्याच्या आईला दिली होती. हा खोटेपणा अखेरपर्यंत जपला गेला. डॉ.राजीव पाटील यांनी ३० जुलैच्या मध्यरात्रीनंतरचा इत्यंभूत घटनाक्रम 'लोकमत'ला सांगितला. डॉ.पाटील म्हणाले, ३० जुलैच्या रात्री ३.५५ वाजता अजय वणवे या मुलाला बेशुद्धावस्थेत अंजनसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहनातून आणण्यात आले. अजयच्या नाकाला आणि वरच्या ओठाला गंभीर दुखापत झाली होती. मुर्च्छितावस्थेत जुजबी प्राथमिक तपासणी केली. त्याच्या जखमांचे गांभीर्य माझ्या लक्षात आले. त्याच्या चेहऱ्याचे हाडदेखील फ्रॅक्चर असू शकेल, अशी शक्यता मला त्यावेळी वाटली. लहानग्या अजयला त्यावेळी आवश्यक असणाऱ्या उपचारांसाठीची सोय प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्यामुळे त्याला वेळ न दवडता अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करणे अत्यंत आवश्यक होते. काही इंजेक्शन्स मी त्याला दिली. तत्पूर्वी आवश्यक प्रक्रियेनुसार रुग्ण आरोग्य केंद्रात दाखल होताच काही नोंदी घ्याव्या लागतात. अंजनसिंगीचे आरोग्य केंद्र हे मुळातच प्राथमिक उपचार केंद्र असल्यामुळे अंतिम इलाज आणि निदान मुळीच शक्य नाही. गंभीर रुग्णांना लागलीच 'स्पेशालिटी हॉस्पिटल'मध्ये रवाना करणे आवश्यक असताना वैद्यकीय नोंदींसाठीच्या परीक्षणात वेळ व्यर्थ जाऊ नये यासाठी आम्ही, रुग्णांसोबतच्या मंडळींनाच जखम कशी झाली, हे विचारतो. रुग्णासोबत असलेली व्यक्ती सत्यच सांगेल, हे अर्थात्च गृहित असते. अजयच्या प्रकरणातही हाच प्रघात पाळला गेला. सोबतच्या व्यक्तिंना जखम कशामुळे झाली, हे मी विचारले. पाय घसरून तो बाथरूममध्ये पडला, अशी स्पष्ट माहिती सोबतच्या व्यक्तिंनी दिली. तीच नोंद मी घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्राने घेतलेली नोंद ही अंतिम निदानाच्या रकान्यात घेतलेली नसते. ती तात्पुरत्या निदानाच्या रकान्यात घेतली जाते. मीदेखील त्याच रकान्यात नोंद घेतली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निदानाचा दिला जात असलेला हवाला अयोग्यच ठरतो, असेही मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.
आश्रमानेच दिली डॉक्टरांना खोटी माहिती
By admin | Updated: September 10, 2016 00:10 IST