अमरावती : परिपूर्ण विकासकामांमुळे बारामती नावारूपास आली आहे. त्याच्या धर्तीवर अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू. पायाभूत सुविधांतून विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या शुभारंभ व लोकार्पणप्रसंगी त्या बोलत होत्या. खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसड, पंचायत समिती सभापती पूजा आमले, सदस्य कल्पना ढवळे, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.
रस्ते हे देशाच्या रक्त वाहिन्या आहेत, रस्ते निर्मितीतून उद्योग, व्यवसायाला चालना मिळून त्या त्या जिल्ह्याचा विकास होत असतो. त्यामुळे
रस्त्यांच्या सुधारणेची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करून विहित मुदतीत ही कामे पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी दिले. अपूर्ण कामे वेगाने पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात असून, नवीन कामेही हाती घेण्यात येत आहेत, असेही त्या म्हणाल्या.
--------------
श्री अच्युत महाराज विकास आराखडा
श्री अच्युत महाराज यांंची कर्मभूमी शेंदूरजना बाजार व परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अच्युत महाराज यांच्या नावाने विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी यावेळी केली. आशियाई विकास बँकेच्या सहकार्यातून तिवसा-कुऱ्हा-अंजनसिंगी-धामणगाव रेल्वे-देवगाव-यवतमाळ रस्त्याच्या सुधारणा कामांचे, रिद्धपूर-तिवसा रस्ता, नेरपिंगळाई व रिद्धपूर येथील रिद्धपूर-तिवसा रस्ता सुधारणा कामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.
--------------
जिल्ह्यात ३२० किमी रस्ते
संपूर्ण महाराष्ट्रात मंजूर झालेल्या नऊ प्रकल्पांपैकी तीन अमरावती होणार आहेत. रस्ते निर्मिती व पुलांची दुरुस्ती अंतर्गत
४२० किमी लांबीपैकी ३२०किमी लांबीचे काम बांधकाम विभागाद्वारे पूर्ण होणार आहेत. यानंतरही या रस्त्याची 5 वर्षच्या दुरुस्ती व देखभाल चे काम सुध्दा संबंधित यंत्रणेला दिले आहे. इंडियन रोड स्टॅण्डर्ड नुसार निर्माणाधिन रस्त्याची रुंदी 10 मीटर असनार. योजने अंतर्गत जिल्ह्यातील जे पूल नादुरुस्त त्याची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे. या रस्ते निर्मितीतून सुमारे १६५ किमी लांबीचे रस्ते काम पूर्ण होणार आहेत, अशी माहिती अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांनी प्रास्ताविकातून दिली.