(लोगो)
अमरावती : सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने इंटरनेटची गती कमी झाल्याच्या व सर्व्हरमध्ये अडचणी येत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. बुधवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने कोणीही इच्छूक वंचित राहू नये, यासाठी ऑनलाईन उमेदवारी अर्जासोबतच पारंपरिक पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची वेळ देखील ५.३० वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे आयोगाने मंगळवारी स्पष्ट केेले.
जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली. यामध्ये तीन दिवस सार्वत्रिक सुट्या आल्याने सोमवारपासून उमेदवारी अर्जांची संख्या वाढली. अर्ज दाखल करीत असताना सोमवारी अनेक ठिकाणी इंटरनेटची गती कमी, सर्व्हरला अडचणी येत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. या तांत्रिक दोषांमुळे इच्छुक उमेदवार वंचित राहू नये, त्यांनाही निवडणूक लढविण्याची संधी मिळावी, यासाठी आता पारंपरिक पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. छाननीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध ठरलेले ऑफलाईन अर्ज संगणक प्रणालीमध्ये दाखल केले जातील.
३० डिसेंबरला शेवटच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता, उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत दुपारी ३ ऐवजी सायंकाळी ५.३० पर्यंत राहील, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.
बॉक्स
मार्चमधील प्रक्रियेतील बँक खाते ग्राह्य
उमेदवारी अर्जासोबत शेड्यूल्ड बॅकेत स्वतंत्र खाते उघडण्यात यावे. याच खात्यामधून निवडणुकीचा खर्च करण्यात यावा, असे निर्देश आहेत. याशिवाय जिल्हा बँकेच्या खात्यासदेखील आयोगाच्या २४ डिसेंबरच्या पत्रान्वये मान्यता देण्यात आली. जिल्ह्यात ५२४ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया मार्च महिन्यात स्थगित करण्यात आली होती. यावेळचे बँक खात्यातून निवडणूक खर्च करण्यास यापूर्वी परवानगी नव्हती. मात्र, आयोगाद्वारे मंगळवारी या खात्यामधून खर्च करण्यास मुभा दिलेली आहे.