पाच दिवस पूर्ण : आरोपींचा सुगावा नाही अमरावती : वलगावचे सरपंच अब्दुल करीम अब्दुल जलील (५०,रा. वलगाव) यांच्या निर्घृण हत्येला आठवडा उलटत असतानाही पोलिसांकडून चौकशीचे गुऱ्हाळे केली जात आहेत. ही घटना खानापूर जावरा शेतशिवारात १९ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. मात्र, अद्यापपर्यंत पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला नसल्याचे आढळून आले आहे. वलगावचे सरपंच कम्मू ऊर्फ अब्दुल करीम हे सकाळच्या सुमारास गावकऱ्यांना गाव परिसरात दुचाकीने फिरताना दिसले होते. त्या सरपंचाने सकाळी ७.५ वाजता एका चहाटपरीवर चहा घेतला. ही बाब सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यानंतर ते दुचाकीने त्यांच्या मालकीच्या शेतशिवाराकडे गेले. मात्र, त्यानंतर शेतशिवारात काय घडले, याबाबत कोणालाच काही माहिती नाही. सपरंच अ.करीम यांचा मृतदेह मुख्य रोडपासून दीड किलोमिटर आतील शेतशिवारात आढळला. त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडी सारख्या धारदार शस्त्राने घाव मारल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, पी.डी. डोंगरदिवे, वलगावचे ठाणेदार दत्ता गावडे, गाडगेनगरचे ठाणेदार के.एम. पुंडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली होती. याप्रकरणात पोलिसांनी गावखेड्यातील शंभरावर नागरिकांची चौकशी केली. अ. करीम यांच्या संपर्कातील नागरिकांची चौकशी पोलिसांनी केली. आता या चौकशीला आठवडा उलटत आहे.
सरपंच हत्याप्रकरणात चौकशीचे गुऱ्हाळ
By admin | Updated: December 25, 2016 00:05 IST