अमरावती : विविध विभागासाठी आलेला निधी परत जाता कामा नये सर्व निधी मंजूर कामावर ३१ मार्चपूर्वी खर्च करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.
शासनाकडून विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध विभागाला आलेला निधी शिल्लक न राहता तो निधी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच म्हणजेच ३१ मार्चपर्यंत खर्च झाला पाहिजे. निधी शिल्लक राहिल्यास संबंधित खातेप्रमुखांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अध्यक्षांनी दिला आहे.
जिल्ह्यातील विविध गावात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत कामे सुरू आहेत. अशा कामांच्या ठिकाणी अधिकारी स्वत: भेटी द्याव्यात, कामांचा संदर्भातील अहवाल प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. १५ वा वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आला असून त्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने व्हावा अशा सूचनाही अध्यक्षांनी दिल्या आहेत.
बॉक्स
पेंडींग कामाचा निपटारा करा
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडे विकासकामे तसेच अन्य प्रशासकीय कामांचे पेंडींग असलेले प्रस्ताव वेळीच निकाली काढावेत. कुठलेही प्रस्ताव कारण नसताना पेंडींग ठेवू नये, सर्वसामान्यांची कामे वेळेवर करावीत. यात कुणीही वेळकाढूपणा न करता आपली जबाबदारी योग्य पध्दतीने आणि वेळेवर पाडावी अशा सूचनासुध्दा अध्यक्षांनी दिल्या आहेत.