अमरावती : शहराला सोमवारी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान शहरात वादळी पाऊस आणि गारपीटही झाली. तब्बल तासभर पावसाचे थैमान सुरू होते. होळीनंतर उन्हाच्या झळा नुकत्याच जाणवू लागल्या असताना या पाऊसधारा दिलासा देणाऱ्या ठरल्या. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी तब्बल १७ तास अखंड बरसलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली होती. परंतु सोमवारचा पाऊस आणि गारपीट केवळ शहरापुरती मर्यादित असल्याने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा होणारी हानी टळली. हवामान खात्याने यापूर्वीच ९ व १० मार्च रोेजी अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. ‘लोकमत’ने त्याबाबतचे वृत्तही प्रकाशित केले होते. त्यानुसार सोमवारी दुपारपासूनच शहरातील वातावरणात बदल जाणवू लागला. आकाश ढगांनी भरून आले. सायंकाळी ७ च्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सोबतच गारांचा वर्षावही सुरू झाला. (प्रतिनिधी)नागरिकांची त्रेधा : चिखलदऱ्यात बरसल्या तुरळक सरी शहरात बोराच्या आकाराची गार वादळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. बोराच्या आकाराच्या गारांनी शहरातील रस्ते व्यापून गेले. क्षणात रस्ते निर्मनुष्य झाले. वेगाने कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. परंतु शहरवासियांनी हा पाऊस एन्जॉय केला. ग्रामीण भागाला फटका नाही शहरात गारपीट सुरू असताना ग्रामीण भागात चिखलदरा वगळता अन्य कोठेही पाऊस पडल्याचे वृत्त नाही. चिखलदरा तालुक्यात तुरळक सरी बरसल्या. अंजनगाव, तिवसा, दर्यापूर, वरूड, मोर्शी व इतर तालुके मात्र कोरडेच होते. बडनेऱ्याच्या आठवडी बाजारात नागरिकांची तारांबळबडनेरा येथे सोमवारी आठवडी बाजार भरतो. आसपासच्या वीस-पंचवीस खेडेगावांतील ग्रामस्थ येथे बाजारासाठी येतात. सायंकाळी वादळी पाऊस व गारपीट सुरू झाल्याने बाजारातील दुकानदार, व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांचीदेखील प्रचंड तारांबळ उडाली. साहित्याचे नुकसान झाले. पळापळ माजली. परंतु गारा मोठ्या आकाराच्या नसल्याने कोणतीही हानी झाली नाही.
शहरात गारपीट, जिल्हा बचावला !
By admin | Updated: March 10, 2015 00:27 IST