तिवसा : ‘गुरूदेव सद्गुरू आडकोजी ने कृपी सिंचन किया, तुम भी भजन लिखते रहो आशिष यह मुझको दियातबसे भजन-लेखन बढा, इस हाथ से सम्भले नही, गंगा प्रवाहित वाक्यरचना सहज ही होती गई’ या शब्दांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांचे गुरू आडकोजी महाराजांबद्दलची भावना व्यक्त केली आहे. ज्याने या विराट ब्रह्मांडातील दिव्यतत्त्वबोध जगाला दिला, त्यांचे सद्गुरूविषयी चिंतन, विचार आजही प्रेरक ठरावेत असे आहेत. ज्ञान काही एका जन्मात प्राप्त होत नाही, हे सांगताना राष्ट्रसंत म्हणतात. ‘तुकड्यादास म्हणे ही सांगड कोटी जन्माची, तरीच फळे सद्गुरू कृपा अंतर्ज्ञानाची’. हे ज्ञान कोणा हाडामासाच्या गुरूकडून प्राप्त होत नाही. ‘गुरूकृपा नही पडी सडकपर मेरा मै जानू, बीज न बोए जाते खडकपर मेरा मै जानू’ यातून गुरूकृपा किती खडतर प्रवासातून मिळते व प्रसंगी जीवाचा बलिदानही देण्याची तयारी ठेवावी लागते, असे राष्ट्रसंत सांगतात. अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवामंडळाचा पायाही याच तत्त्वबोधावर आधारित आहे. ‘जनी देखिला जनार्दन, हीच आत्मानुभवाची खुण’, हे राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील उद्बोधन गुरूत्वाकडे व जीवनाच्या पूर्णत्वाकडे नेणारे आहे. गुरू कसा असावा आणि त्याची ओळख कशी करून घ्यावी याचे विवेकज्ञान समाजातील साध्या भोळ्या भक्तांना लक्षात घेणे गरजेचे आहे. भक्तीच्या मार्गात गुुरूच्या शोधात असणाऱ्या गुरू-शिष्य परंपरा जोपासणाऱ्या साधकांना हितबोध देताना राष्ट्रसंत म्हणतात. ‘न होत गुरूजी पूजा, गुरूस माळ घालुनिया, न होत गुरूची पूजा गुरूस गंध लावुनिया, पूजा गुरूची होत असे, वचने त्यांची पाळुनी, तसेच जगी वागणे, जरी प्राण जायी क्षणा’ ही गुरू-शिष्य परंपरा राष्ट्रसंतांना अपेक्षित आहे. गुरू उत्तम आचरणशील, ज्ञानवान असतील तरच हे सर्व साधणे शक्य आहे. नाही तर ढोंगी गुरूंमुळे माणूस माणूसही राहत नाही. तो राक्षसच होतो. पोट भरणारे, आळशी, व्यसनाधीन गुरू आपल्या शिष्यांना उन्नत करण्याकडे लक्ष देणेच शक्य नाही. कारण, त्यांना पापाचा पैसा घेऊन स्वत:च्या बढाईचे, परमार्थाच्या बडेजावाचे दुकान वाढवायचे असते. अशांना गुरू करू नये. खरा गुरू म्हणजे अनुभवाचा बोध देणारा पुरूष. असे पुरूष शोधावे लागतात. ते गल्लोगल्ली मिळत नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रसंतांनी गुरूची विराट व्याप्ती ग्रामगीतेत सांगितली आहे. सन्मार्ग दाखविणारा आणि शिष्याला त्याच्या न्युनत्वाची जाणिव करून न देता त्याचे दोष दूर करणाराच सच्चा गुरू असतो.महापुरूष वेगळाले, परि गुरूत्वी मिळोनि गुरूचि झाले, व्यक्तिपण, धर्मपणही मुराले, गुरू-स्वरूपी, त्याचे पूजन गंधाने नोहे, त्याचे मंदिर विशाल आहे, विशालतेला मर्यादा राहे, परि गुरू त्याहूनि अमर्याद, भूमंडळ ज्याचे क्षेत्र पूर्ण, सर्व पृथ्वी जयाचे आसन, चंद्र-सूर्य नंदादीप जाण, गुरुदेवाचे !- राजेश बोबडे, गुरूकुंज मोझरी.
राष्ट्रसंतांच्या दिव्यदृष्टीतून गुरूपौर्णिमा
By admin | Updated: July 31, 2015 00:47 IST