अमरावती : उन्हाळी सुटीनंतर २६ जून २०१४ पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी गुरूजी चिमुकल्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करणार आहेत. तसेच गोड खाऊसह शालेय अभ्यासक्रमाचा मोफत संचदेखील दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी जनजागृतीचे आदेश शासनाने शाळा व्यवस्थापनाला दिले आहेत. शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम रहावा, यासाठी शिक्षण विभागाद्वारे दरवर्षी नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. यासाठी यंदादेखील पहिल्या दिवशी शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शाळेला प्रशासनाने आदेश बजावले आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वीच २६ जून रोजी शाळा सुरू होण्याबाबत ध्वनीक्षेपकावरून जनजागृती करावी. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत एक दिवस आधी पालकांची भेट घेऊन त्यांना शाळा सुरू होण्याविषयीची माहिती अवगत करावी. तसेच प्रवेशपात्र बालकांचा अर्ज तेथेच भरावा.गावातील नागरिक, युवक व क्रीडा मंडळाच्या सहकार्याने शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात यावा. तसेच सडा-रांगोळी काढण्यात यावी. उपलब्ध फुले व पानांचे तोरण बांधून शाळेची सजावट करण्यात यावी, असे शिक्षण विभागाला अभिप्रेत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रभातफेरी काढून त्यात शिक्षकांनी सहभागी व्हावेत व यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, बचतगट व नागरिकांचाही सहभाग असावा, असेही शिक्षण विभागाने शिक्षकांना बजावले आहे. (प्रतिनिधी)
शाळा प्रवेशाचे गुलाब पुष्पाने होणार स्वागत
By admin | Updated: June 14, 2014 23:02 IST