सार्वजनिक नळावर झुंबड : जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती
बडनेरा : बडनेरा शहरात कृत्रिम पाणी टंचाईची समस्या भीषण झाली आहे. सार्वजनिक नळांवर पाण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडत असून नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पाईपलाईन ‘लिकेज’ असल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांमध्ये नियोजनाचा अभाव असल्यामुळेच बडनेर्याचा पाणी प्रश्न भीषण स्वरुप घेत आहे. अमरावती शहरात मुबलक पाणी असताना मात्र केवळ जीवन प्राधिकरण अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे बडनेरा शहराला पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जीवन प्राधिकरणाने बडनेर्यातील जुन्यावस्तीत नवीन टाकी उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र त्या प्रस्तावाला अद्यापही मंजुरात मिळालेली नाही. जोपर्यंत नवीन टाकी उभारल्या जात नाही तो पर्यंत बडनेरातील पाणी समस्या कायम राहण्याचे चिन्हे दिसत आहेत. (शहर प्रतिनिधी) सार्वजनिक नळांना दूषित पाण्याचा पुरवठा आधीच पाणी कमी त्या समस्येमुळे त्रस्त असणार्या बडनेरातील नागरिकांना सार्वजनिक नळांवर पाणी भरताना दूषित पाण्याचा नाईलाजास्तव वापर करावा लागत आहे. अशोकनगर परिसरातील सार्वजनिक नळातून हिरव्या रंगाचे पाणी मिळत असल्याची ओरड महिलांची आहे. बडनेरा शहरात पाईप लाईनमध्ये ठिकठिकाणी लिकेजेस असल्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. सार्वजनिक नळांवर एकच झुंबड जुन्यावस्ती व नव्या वस्तीतील अशोकनगर, हरीदासपेठ, हमालपुरा, लढ्ढा प्लॉट, शिवाजीनगर या वस्त्यांमधील सार्वजनिक नळांना जेमतेम पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असून यातून वादाची स्थितीही निर्माण होत आहे.