अमरावती : कोरोनाने निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा मूूलमंत्र दिला आहे. जिल्ह्याच्या सुदैवाने येथे एकूण २५ टक्के भूभागावर वनक्षेत्र आहे. महेंद्री व पोहरा-मालखेड हे दोन्ही जंगले अभयारण्य व्हावी, असे तेथील वन्यजीवन आहे. भविष्यात तसे झाल्यास जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनात एक मोठी उपलब्धी होईल. शनिवारी असलेल्या पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी अमरावतीकरांनी बुलंद केली आहे.
अमरावती जिल्ह्याचे क्षेत्रफळ १२२३४ चौरस किमी असून त्यापैकी वनक्षेत्र हे ३३०० चौरस किमी क्षेत्रावर पसरले आहे. यामध्ये वन्यजीव संरक्षित क्षेत्र असलेल्या मेळघाटचे जंगल, महेंद्री राखीव जंगल, पोहरा-मालखेड राखीव जंगल व त्या भोवतालचे क्षेत्र तसेच सालबर्डी परिसरातील जंगल यांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यात काही गवताळ माळरानसुद्धा अस्तित्वात आहे. या वनक्षेत्रामुळे व देशातील सर्वात जुना व राज्यातील आकाराने सर्वांत मोठा असा व्याघ्र प्रकल्प जिल्ह्यात असल्याने येथील वनक्षेत्र समाधानकारक आहे. यातील अर्ध्या क्षेत्रास संवर्धनाचा दर्जा प्राप्त असल्याने त्याचे कायद्याने संवर्धन होत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र, वरूड तालुक्यातील महेंद्री जंगल आणि इतर जंगलांचा संवर्धनाअभावी ऱ्हास होत आहे. महेंद्री जंगल हे मेळघाट व पेंच या दोन जंगलांना जोडणारा व्याघ्र भ्रमण मार्ग आहे. त्यामुळे या जंगलाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. या जंगलास अभयारण्याचा दर्जा मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. तसा प्रस्तावसुद्धा राज्य शासनाच्या वन्यजीव मंडळाला पाठविण्यात आला होता. परंतु त्यावर निर्णय होऊ शकला नाही. महेंद्री व पोहरा-मालखेड हे दोन्ही जंगले अभयारण्य व्हावी, असे तेथील वन्यजीवन आहे. भविष्यात तसे झाल्यास जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनात एक मोठी उपलब्धी होईल.
बॉक्स
रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर
गावखेड्यातील पाण्याचे नियोजन यावर विशेष लक्ष देऊन भूजल पातळी पुन्हा वाढवण्यावर भर द्यावा लागेल. त्यासाठी शहर व गावातील रहिवासी असलेल्या प्रत्येकाला आपल्या घरावर पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची (रेन वाटर हार्वेस्टिंग) यंत्रणा करावी लागेल. सौरऊर्जेचा वापर वाढवून वीज मिळविण्यासाठी होणाऱ्या प्रदूषणाला आला घालावे लागेल. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने वाटचाल न झाल्यास कोरोनासारख्या महामारीने भविष्यात मानवाचे अस्तित्व या पृथ्वीवरून नष्ट केले, तर नवल वाटायला नको, असे मत पर्यावरण अभ्यासक जयंत वडतकर यांनी व्यक्त केले.
------------------------