अमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने यंदा ८० हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाबीज प्लॉटमधील बियाण्यांची उगवण शक्ती कमी आहे. राज्याला सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करणार्या मध्यप्रदेशातदेखील सोयाबीनची टंचाई आहे. याचा फायदा घेऊन बियाण्यांंचा काळाबाजार करणार्या व्यापार्यांवर फौजदारी तसेच संबंधित अधिकार्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजीत पत्रपरिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री पुढे म्हणाले की, अन्य राज्यामधून व व्यापार्यांजवळ साठवून ठेवलेल्या सोयाबीनमधून बियाण्यांची तूट भरुन काढण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. जिल्ह्यात ५६ भरारी पथक कार्यान्वित आहेत. बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी सर्व यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. कृषिसेवा केंद्रात बियाणे, खते व औषधांच्या उपलब्ध साठ्याबाबत दर्शनी भागात फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकर्यांनी घरगुती बियाण्यांची पेरणी करताना सोयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता असली तरी निवडणूक प्रभावित होणार नाही याची काळजी घेऊन खरीपपूर्व आढावा बैठक घेण्याची अनुमती आयोगाने दिली आहे. राज्यात ४१ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशी व सोयाबीनची पेरणी होईल. काही ठिकाणी कमी-जास्त पेरणीक्षेत्र असले तरी ते जवळपास सारखेच आहे. गेल्या २-३ वर्षात सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने सोयाबीनकडे शेतकरी आकर्षित झाला आहे. उत्पादकतेवर कपाशीचा भाव अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगीतले. कपाशीच्या लागवडीचे चांगले परिणाम दिसून आले असून आंतरपीक घेतल्याने देखील उत्पादनात वाढ होते. तूर, मूग आतंरपिकासाठी उत्तम आहे.
बियाण्यांचा काळाबाजार करणार्या व्यापार्यांवर फौजदारी
By admin | Updated: May 23, 2014 23:34 IST